गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही धरणात कमी साठा
हिरडस मावळ – भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरण साठ्यात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या मुसळधरार पावसामुळे झपाट्याने वाढ झाली आहे. आ (द्दि. 21) सकाळी भाटघर धरण 41.39 टक्के, तर नीरा देवघर धरण 48.36 टक्के भरले आहे.
जुलै महिना अर्धा संपला तरीही भोर तालुक्यात दमदार पाऊस झाला नव्हता. गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झाल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ झालेली नव्हती. गेल्यावर्षी भाटघर धरण 12 ऑगस्टला तर नीरा देवघर धरण 13 ऑगस्टला भरले होते. या तुलनेत यंदा दोन्ही धरणांतील पाणीसाठा कमी आहे. गेल्या दोन दिवसांतच दोन्ही धरण क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसाने 10 ते 12 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता 23.74 टीएमसी तर नीरा देवघरची 11.91 टीएमसी आहे. पश्चिम भागात डोंगरमाथ्यावर पाऊस पडत असला तरी दि.20 रोजी रात्री पासून पावसाचा जोर कमी झाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस झाला तर धरणाच्या पाणी साठ्यात आणखी वाढ होईल.