मंगेश रत्नाकर
नारायणगाव – मांजरवाडी (ता. जुन्नर), रांजणी (ता. आंबेगाव) या भागातील पारंपरिक बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी जैन टिशूकल्चर केळी इराण, इराकच्या बाजारपेठेत निर्यात करून इतिहास रचला आहे. केळी निर्यातीला असलेली मोठी मागणी व भविष्यातील संधी ओळखून ही किमया घडवून आणली.
कारफाटा येथील जैन ड्रीपचे विक्रेते महेंद्र भोर, जैन कंपनीचे तुषार जाधव यांच्या पुढाकाराने जानेवारी 2023 ला शेतकरी रवींद्र थोरात, अजित धुमाळ, शामराव भोर, निवृत्ती निकम, सोमनाथ सोनवणे, विजय थोरात, पांडुरंग निकम, विनायक मुळे व आणखी 30 ते 35 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केळी लागवडीपूर्वी कंदर, टेंभूर्णी व इंदापूर भागातील केळी बागायतदारांच्या भेटी घेतल्या.
तसेच विविध केळी निर्यात केंद्र व कोल्ड स्टोरेजची पाहणी करून निर्यातीची प्रक्रिया समजून घेतली. त्यानंतर गट शेतीच्या माध्यमातून 50 एकरवर “जैन केळी’ रोपांची लागवड केली. प्रत्येक बागेला डबल ड्रीप नळी टाकून त्याद्वारे पाणी व खत व्यवस्थापन केले. जुलैमध्ये घड बाहेर पडल्यानंतर घड व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये बड इंजेक्शन, फुले काढणे, फण्या कमी करणे व रस शोषणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावापासून केळी पिकाच्या संरक्षणाकरिता आवश्यक फवारण्या करण्यात आल्या.
6 लाख 50 हजारांची निव्वळ नफ्याची आशा
दहा महिन्यानंतर केळी कापणीस सुरुवात झाली असून पहिल्याच प्रयत्नात केळी इराण, इराक देशात निर्यात होत असल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पहिल्या कापणीला 23 रुपये 50 पैसे प्रति किलोचा भाव मिळाला असून दर टिकून राहिल्यास प्रति एकर खर्च वजा जाता 6 लाख 50 हजार रुपये निव्वळ नफा मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. सुरुवातीच्या काळात इतर ठिकाणाहून दररोज शेकडो कंटेनर केळीची बाह्य देशात निर्यात होत असताना जुन्नर, आंबेगाव तालुक्यातून मात्र स्थानिक बाजारपेठेतच केळी विक्रीसाठी पाठविल्या जात.
तीन कंटेनरमधून 66 टन केळीची निर्यात
केळी उत्पादनाचा कालावधी एक वर्ष असून डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा गट शेतीच्या माध्यमातून 120 एकर क्षेत्रात लागवड केली जाणार आहे. एका एकरमध्ये 1450 रोपांची लागवड केली जाते. मागील वर्षी लोकांना 17 रुपये 50 पैसे भाव होता. चालू वर्षी 19 रुपये 75 पैसे रोपांना भाव असून एकरी 28640 रोपांचा खर्च आला. आतापर्यंत पाच ते सहा शेतकऱ्यांची केळी निर्यात होण्यास सुरुवात झाली असून तीन कंटेनरमधून 66 टन केळीची निर्यात करण्यात आली आहे. एका एकरमध्ये 40 टन माल निघतो. केळीची रोपे जळगाववरून जैन कंपनीच्या माध्यमातून पुरवली जाते, अशी माहिती शेतकरी रवींद्र थोरात यांनी दिली.