जगाच्या पाठीवर जे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात त्यापैकी क्रिकेट या एकमेव क्रीडा प्रकाराला “जेंटलमॅन गेम’ म्हणून संबोधले जाते. सुमारे सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या क्रिकेटला अनेक नियमांचे कोंदण असल्याने आणि हा खेळ या नियमांच्या अधीन राहूनच खेळला जात असल्याने क्रिकेटचे वर्णन नेहमी सभ्य गृहस्थांचा खेळ असे केले जाते. अर्थात, गेल्या शंभर वर्षांच्या कालावधीमध्ये क्रिकेटने जे विविध प्रकारचे बदल पाहिले त्या प्रमाणात या खेळातील नियमही बदलत गेले. सध्या भारतात सुरू असलेल्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये या सभ्य गृहस्थांच्या खेळामध्ये जे विविध प्रकारचे वादविवाद निर्माण झाले आहेत त्याला मुख्य कारण क्रिकेटमधली वाढती स्पर्धात्मकता हेच आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेचा अष्टपैलू फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याला क्रिकेटमधील “टाइम आउट’ पद्धतीने बाद देण्यात आल्याने हा एक नवीन वादविवाद समोर आला आहे.
मैदानावर एखादा खेळाडू बाद झाल्यावर पुढील खेळाडूने तीन मिनिटांच्या आत मैदानावर येऊन फलंदाजी सुरू करायला हवी असा नियम सांगतो. पण काही कारणाने मॅथ्यूजला उशीर झाल्यामुळे बांगलादेशच्या कर्णधाराने “टाइम आउट’चे अपील केले आणि अंपायरने नियमांच्या अधीन राहून त्याला बाद दिले. या घटनेनंतर जागतिक स्तरावर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे आणि मतमतांतरे सुरू झाली आहेत. मॅथ्यूजला अशा प्रकारे बाद देण्याची गरज नव्हती, असाही एक मतप्रवाह आहे, तर नियमांच्या पुस्तकांमध्ये जर “टाइम आउट’चा नियम असेल तर बाद देणे बरोबरच आहे, असेही म्हणणारे काही लोक आहेत. बांगलादेशच्या कर्णधाराच्या म्हणण्याप्रमाणे, आम्ही महत्त्वाचा सामना खेळत होतो आणि यावेळी जर आम्हाला एखाद्या खेळाडूला बाद करण्याची संधी मिळत असताना आम्ही ती संधी नियमाच्या अधीन राहून वापरली असेल, तर त्याचा एवढा बाऊ करण्याचे कारण नाही.
पण या घटनेनंतर बांगलादेश आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये विनाकारण तणावाचे वातावरण निर्माण झाले. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलनही केले नाही किंवा एकमेकांचे अभिनंदनही केले नाही. क्रिकेटच्या नियमांच्या अधीन राहून खेळ खेळणे आणि आपल्याला फायदेशीर ठरेल अशाप्रकारे नियमांचा वापर करणे हे जरी बरोबर असले तरी अनेक वेळा सद्सद्विवेक बुद्धीचाही वापर करावा लागतो, याचा विसर कदाचित बांगलादेशच्या कर्णधाराला पडल्यामुळे हा वादविवाद निर्माण झाला आहे. कारण जरी नियमाप्रमाणे मॅथ्युज वेळेवर मैदानात आला असला, तरी त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटल्यामुळे प्रत्यक्ष फलंदाजी करायला त्याला उशीर लागल्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बांगलादेशच्या कर्णधारानेही आणि मैदानावरील अंपायर्सनीसुद्धा ही परिस्थिती लक्षात घ्यायला हवी होती, असा एक विचार प्रवाह समोर आला आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये नेहमीच कर्णधाराचे महत्त्व असते. एखाद्या विषयावर अपील करायचे की नाही हे संपूर्णपणे कर्णधार ठरवतो.
अपील केल्यानंतर त्यावर निर्णय देण्याव्यतिरिक्त अंपायरसमोर कोणताही पर्याय नसतो. काही महिन्यांपूर्वी एका सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने मंकडिंग पद्धतीने बाद करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केल्यानंतर फलंदाज बाद झाल्याचे अपिल करण्यास नकार दिला होता. म्हणजेच रोहित शर्माने तेव्हा मैदानावर सभ्यपणा दाखवला होता. भारतीय कर्णधाराने अनेक वेळा असा सभ्यपणा दाखवला आहे. एखादा कॅच नियमाप्रमाणे नसतानासुद्धा अंपायरने बाद दिला असेल तरी विरोधी संघाच्या खेळाडूला परत बोलवण्याचे काम आपल्या कर्णधारांनी अनेक वेळा केले आहे. म्हणजेच जरी क्रिकेट खेळण्यासाठी नियमांचे पुस्तक तयार करण्यात आले असले, तरी ते नियम वापरण्याचा अधिकार ज्या कर्णधाराला असतो त्या कर्णधाराची सद्सद्विवेक बुद्धी सर्वात महत्त्वाची असते. आधुनिक काळात स्पर्धात्मक वातावरणात क्रिकेट खेळले जात असल्याने अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडत राहतात. क्रिकेट हा फक्त खेळ न राहता एक ईर्ष्या आणि टोकाची स्पर्धा झाल्यानेच अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली जात आहे.
एक दिवसापूर्वी झालेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलच्या तुफानी खेळीमुळे अफगाणिस्तानला आपला हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागला. या सामन्यावेळी ग्लेन मॅक्सवेल हा दुखापतग्रस्त झाल्यानंतर सामना काही काळ थांबवण्यात आला होता. पण त्यावेळी अफगाणिस्तानचा एकही खेळाडू मॅक्सवेलची चौकशी करण्यासाठी जवळ आला नाही. या विषयाचीसुद्धा चर्चा आता सुरू झाली आहे. मॅक्सवेलमुळे आपण सामना हरणार आहोत अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असल्यामुळेच त्याच्या दुखापतीची चौकशी करण्याचा शिष्टाचार त्यांना पाळता आला नाही. खरे तर क्रिकेट असो किंवा इतर कोणताही सामना असो त्यामध्ये हार किंवा जीत हे दोनच पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या विशिष्ट दिवशी जो संघ चांगला खेळतो त्या संघाला विजय मिळतो याचा अर्थ हरणारा संघ कमी दर्जाचा असतो असेही नाही. पण क्रिकेटसारख्या खेळामध्ये स्पर्धात्मकता प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे हार आणि जीत खिलाडूवृत्तीपणे घेण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून डीआरएस सिस्टीम सुरू झाल्यापासूनही काही वादविवाद सुरू झाले आहेत.
मैदानावरील अंपायरच्या निर्णयावर जरी अपील करता येत असले तरी संदिग्ध प्रकारच्या निर्णयामध्ये मैदानावरील अंपायरचा निर्णयच अंतिम मानला जात असल्याने आता या अंपायर्स कॉल या पद्धतीलाही आक्षेप घेतला जात आहे. क्रिकेटमध्ये जसजसे बदल होत गेले त्याप्रमाणे नियमातही बदल करण्यात आले असले, तरी काही नियमच वादविवाद निर्माण करत असल्याने आता आयसीसीच्या तज्ज्ञ समितीला या नियमांबाबतही विचार करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीने मंकडिंग पद्धतीच्या आउट करण्याच्या पद्धतीला हिरवा कंदील दाखवला आहे. अशाच अनेक नियमांमध्ये योग्य प्रकारे बदल करण्याचा विचार आता करावा लागेल. मुळात जेव्हा हे नियम तयार करण्यात आले तेव्हा फक्त पाच दिवसांचे क्रिकेटच अस्तित्वात होते.
आता क्रिकेटमध्ये 50 षटकांचे, 20 षटकांचे, 10 षटकांचे असे विविध क्रीडा प्रकार समोर आले असल्याने या सर्वांसाठी योग्य असे नियम तयार करावे लागणार आहेत. तरच या सभ्य गृहस्थांच्या खेळातील वादविवादाचे प्रमाण कमी होईल. अर्थात, क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो त्यासाठी जे नियम करण्यात आले आहेत त्याचा वापर कशा प्रकारे करावा याचा निर्णय संबंधित खेळाडू आणि कर्णधार जेव्हा योग्य प्रकारे घेतील तेव्हाच हे वादविवाद आणखी काही प्रमाणात कमी होतील, हे निश्चित. कर्णधार असो किंवा खेळाडू असो त्यांनी खेळाचे नियम आणि सद्सद्विवेक बुद्धीचा समतोल वापर केला तरच असे वाद टाळता येणार आहेत.