नारायणगावात नवरात्रौत्सवाची साधली नामी संधी : विशेषत: महिलांवर बक्षिसांची खैरात
नारायणगाव – नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायत निवडणूक काळात सणोत्सव आल्याने त्याचा लाभ उठविण्याची नामी संधी इच्छुक उमेदवारांनी हेरली आहे. विशेषत: महिला मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी विविध बक्षीसरूपी प्रलोभने दाखवली जात आहेत. समर्थकांच्या माध्यमातून नवरात्रौत्सव मंडळात पैठणी, चांदीच्या मूर्तीसह, सोन्याची नाणी वाटली जात आहेत. आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून हा “बहुमूल्य’ फंडा वापरला जात आहे.
नारायणगाव ग्रामपंचायत वॉर्डातील उमेदवारांकडून आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांच्या पडताळणीच्या कामाला वेग आला. काही निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनी वॉर्डातील महिला मतदारांसाठी नवरात्रीनिमित्त खेळ पैठणीचा, दांडिया आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे. बक्षिसांसाठी अनेक व्यवसायिकांना प्रायोजक करुन महिला मतदारांना खूश ठेवण्यासाठी टीव्ही, फ्रीज, दुचाकी वाहने व सोन्या चांदीच्या भेट वस्तूंचा वर्षाव जाहीर केला आहे. तरी सावित्रीच्या लेकी असलेल्या नवदुर्गा प्रलोभनांना बळी न पडता पुढील पाच वर्षे आपल्या वॉर्डातील कोणता उमेदवार नागरिकांच्या मुलभूत गरजा सक्षमपणे पूर्ण करू शकतो याचा नक्कीच विचार करतील.
वेळप्रसंगी सुख-दुःखात हाक मारल्यानंतर मदत करण्यासाठी धावून येणाऱ्या उमेदवाराचा विचार करून मतदान करतील यात शंका नाही. अनेक उमेदवारांनी मतदारांना आपलेसे करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट घेणे, समाज माध्यमांवर फ्लेक्स बनवून शुभेच्छा देणे आदी उपक्रम राबवित आहे.
आकडेवारीची जुळवाजुळव
निवडणूक आयोगाकडून अचानक ग्रामपंचायत निवडणुकीचे वेळापत्रक घोषित झाल्याने उमेदवारांनी आपल्या खात्रीशीर मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक घोषित झाल्यापासून प्रत्येक पॅनल प्रमुख व इच्छुक उमेदवाराने आपल्या गटाला व विरोधात मतदान करणारा कोण याची आकडेवारी जुळवण्याचे काम सुरू केले आहे. विरोधातील मतदार आपल्याकडे कसे वळविता येईल यासाठी मतदार यादीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे.
बक्षीसप्राय गरब्याने घेतली जागा
पारंपरिक उत्सवाची जागा निवडणुकीमुळे आता बक्षीसप्राय गरब्याने घेतली आहे. यामुळे उच्चभ्रू वस्तीपासून झोपडपट्टीपर्यंत नवरात्रोत्सवात बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गर्दी होत आहे. पैठणी साड्या जिंकण्यासाठी विवाहितेपासून तरुणींचीही गरबा खेळण्यासाठी गर्दी होत आहे. वयोगटानुसार बक्षिसे वाटली जात आहेत.
तटस्थ भूमिका चांगली
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक मताचे मूल्य अवलंबून असल्याने प्रत्येक उमेदवार एक एक मताची जुळवाजुळव करीत असतो. त्यामुळे राजकारण विरहित मतदाराने विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. दैनंदिन व्यवहारात मदत लागत असल्याने आपली अडचण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तटस्थ भूमिका केव्हाही चांगली. निवडणुका नंतर राजकारणी एकत्र येतात हे विसरता कामा नये.