जिल्ह्यात शिवसेनेला सुरूंग; नव्या कार्यकारिणीत उपनेतेपदी निवड
मंचर – शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात सोमवारी दुपारी गेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यांच्या निर्णयाचा पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये आढळराव पाटील यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे ते शिंदे गटात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार झाले. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जाऊ नये, अशी भूमिका पहिल्यांदा खासदार शिवाजीराव पाटील यांनी मांडली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची जुळवून घ्या, असे सांगण्यात आले होते; मात्र गेली अडीच वर्षे मतदारसंघात कामे करत असताना आढळराव पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर असलेल्या संघर्षाबाबत वारंवार बोलून दाखवत होते; मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातूनच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याची बातमी 3 जुलैला विविध चॅनेल, न्यूज पोर्टल यावर प्रसारित झाली; मात्र काही वेळातच आढळराव पाटील हे शिवसेनेत असून त्यांची हकालपट्टी करण्यात आली नसल्याचे पत्र शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले.
पत्रकात आढळराव-पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत राहतील, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली होती. यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पक्षावर व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यावर झालेल्या प्रकरणावर पडदा पडला होता. झालेल्या प्रकाराबाबत आढळराव पाटील प्रचंड नाराज होते ते भाजप किंवा शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हकालपट्टी नाट्यानंतर पुण्यातून लढण्याचा आदेश
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी निधी मिळणे गरजेचे होते; मात्र तो मिळाला नाही. याउलट एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटलांना नगरविकास मंत्री असताना निधी मिळवून दिला आहे. आढळराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा शिरूर मतदारसंघ सोडून पुण्यातून लढण्यास सांगितल्याच्या चर्चा सुरू होत्या. यामुळेही आढळराव पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते.
निष्ठावंत शिवसैनिकांकडे लक्ष
शिरूर लोकसभा मतदारसंघात काम करताना अनेकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर जुळून घ्यावे लागत आहे. तसेच शिवसैनिकांना मतदारसंघात त्रास दिला जात आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिक व नेत्यांना न्याय मिळत नाही याची खदखद मनात असल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षाबाबत नाराज असल्याने आढळराव पाटील अखेर शिंदे गटात गेले आहेत. दरम्यान त्यांच्या या निर्णयाने शिरूर लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली असून निष्ठावंत शिवसैनिक पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले.
माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी मंगळवारी (दि. 19) त्यांच्या निवासस्थानी लांडेवाडी येथे तातडीची बैठक आयोजित केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत ते कार्यकर्त्यांशी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.