बारामती – बारामती परिमंडलामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील जवळजवळ 10 लाख ग्राहकांकडे 518 कोटी रुपये थकीत आहे. त्यातील दहा महिन्यांत एकदाही वीजबिल न भरणारे 4 लाख 81 हजार ग्राहक आहे. त्यांच्याकडे 340 कोटी येणेबाकी आहे. विंनत्या, आवाहन करुनही रक्कम वसुली झाली नसल्याने आता वीज कायद्यातील तरतुदीनुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
गेल्या दहा महिन्यांत बारामती परिमंडलातील 4 लाख 81 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी एकदाही वीजबिल न भरल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती मेटाकुटीला आली आहे. वीज खरेदी व वितरण करणे मुश्किल बनले आहे. परिणामी अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडून वसुली करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याने महावितरणने या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचा कठोर निर्णय घेतलेला आहे.
लॉकडाऊनच्या काळात जनता घरात असताना महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता झटत होते. लॉकडाऊनमध्ये घरगुती ग्राहकांची वीज मागणी रेकॉर्डब्रेक होती. त्यात रिडींग व वीजबिलाची छपाई बंद असल्याने ग्राहकांना छापील बिलाऐवजी मोबाइल मेसेजवर बिले देण्यात आले. ही बिले सरासरीने व कमी होती. प्रत्यक्षात जून महिन्यापासून रिडींग सुरु होताच रिडींगनुसार बिले देण्यात आली.
मात्र, यापूर्वीची बिले न भरल्याने थकबाकी वाढत गेली. त्यासाठी थकबाकीचे हप्ते करण्यात आले. एकरकमी भरणाऱ्यांना सवलत देण्यात आली. वीजग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात 3201 वेबिनार, 5678 मेळावे घेण्यात आले होते. 15524 मदत कक्ष सुरु करण्यात आले होते. त्यापैकी 1742 मदत कक्ष अद्यापही सुरू असून, त्यातून आलेल्या 980499 पैकी 933324 तक्रारींचे निवारण सुद्धा केलेले आहे.