आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथे गेल्या 50 वर्षांपासून प्रदक्षिणा मार्गावर असणारे टपाल कार्यालय हे एका धर्मशाळेत भाडे स्वरूपात चालवले जात असून आता ते सोयी-सुविधे अभावी सलाइनवर आल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
आळंदीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, येथील टपाल कार्यालयाचा व्याप देखील तेवढ्याच प्रमाणात वाढलेला आहे. परिसरात चार-पाच छोटी मोठी गावे या टपाल कार्यालयाला जोडली गेली आहेत. त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र निर्मित झाले आहे, त्यामुळे टपाल कार्यालयाची आवक जावक ही ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे,
मात्र कित्येक वर्षांपासून तेथील कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत्या कामकाजाच्या मानाने अपुरी असल्याचे दिसून येते. या ठिकाणी ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही एक खिडकी योजनेअंतर्गत येथील सर्व व्यवहार हे दोन खिडकींमार्फत चालविले जातात. त्यामुळे ग्राहकांची लाइन रस्त्यावर येते परिणामी वाहतूक कोंडी होते.
तसेच ग्राहकांना निवाऱ्याची कसलीही सोय नसताना उन्हाळा, हिवाळा, पावसाळा वर्षभर सहन करावा लागतो. तरी आळंदी येथील टपाल कार्यालय हे सुसज्ज प्रशस्त जागेत असावेत, अशी मागणी ग्राहक वर्गांकडून गेली अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र याकडे केंद्रीय असणारे टपाल कार्यालय प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
2024 मध्ये करार संपणार
टपाल कार्यालयासाठी आळंदी मरकळ रस्त्यावर आरक्षित जागा असताना देखील ती जागा मिळविण्यासाठी दुर्लक्ष केल्याने ती दुसऱ्याच्या घशात गेली आहे. आता टपाल कार्यालयाने आळंदी नगरपालिकेकडे जागेची मागणी केल्याचे समजते. 2024 मध्ये धर्मशाळेचा करार संपत आला असून या टपाल कार्यालयाची जागा खाली करून द्यावी लागणार आहे. त्यासाठी या टपाल कार्यालयास आळंदीमध्ये सुसज्ज, प्रशस्त अशी जागा शासनाने द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.