कराड – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून राजकारणाचा वापर करत नागरिकांना दहशतीखाली ठेवले जात आहे. नुकतेच बाजारसमितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झालेले प्रवेशही याच दहशतीचा एक भाग होता. या पार्श्वभूमीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनंतर आदित्य ठाकरे कराड-पाटण दौऱ्यावर येणार असून जनतेला या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन करून त्यांची दहशतही ते झुगारून लावतील, असे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या थेट भेट अभियानांतर्गत “होऊ द्या चर्चा’ अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा समन्वयक इंद्रजित गुजर, शहराध्यक्ष शशिराज करपे, शशिकांत हापसे यांची उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले, फसवून खुर्ची मिळवलेल्या या सरकार कारभारही फसवाच असून ते जनतेलाही फसवत आहे. जनतेसह पदाधिकाऱ्यांना नाहक भीती घालून, विविध प्रकारच्या दबावाला बळी पडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामुळेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचीही “होऊ द्या चर्चा’ या अभियानात थेट भेट घेऊन या सरकारच्या खोट्या कामांच्या दिखाव्याची पोलखोल करण्यात येणार आहे.
ते म्हणाले, शंभूराज देसाई हे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून अत्यंत उर्मट भाषा बोलत आहेत. माध्यम प्रतिनिधींशीही उर्मटपणे बोलून त्यांचा अवमान करत आहेत. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. पाटण तालुक्यात गेल्या पाच वर्षात आम्ही पाच-सात कोटींची कामे केली आहेत. परंतु, तालुक्यात विविध रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. याबाबत आपण लवकरच कागदोपत्री पुरावे घेऊन बोलणार आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी पर्यटनासाठी मोठा निधी दिला होता. त्यातही भ्रष्टाचार झाला असल्याचेही कदम त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुका महाविकास आघाडीच्यामाध्यमातून लढवणार
आगामी ग्रामपंचायत, कराड नगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. राष्ट्रवादी आणि आमची जास्त ताकत आहे, त्याठिकाणी एकमेकांना अनुकूल समीकरण ठेवले जाईल. पाटण तालुक्यातील मोठ्या मल्हारपेठ ग्रामपंचायत निवडणुकही लागली असून याठिकाणीही आम्ही पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
गुजर यांच्या संघटनाचा पक्षवाढीस फायदा
कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सातारा जिल्हा समन्वयकपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जिल्ह्यात इंद्रजित गुजर यांचे चांगले संघटन असून त्याचा पक्षवाढीसाठी फायदा होणार आहे. कराड, पाटणसह जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूकांसाठीही त्यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचे कदम यांनी सांगितले.