पुणे – यंदा जिल्ह्यातील बहुतांश धरणे काठोकाठ जरी भरली असली, तरी अनेक तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा वर्षभरासाठीच्या पाणी वाटपाचे नियोजन करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये 97 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली असली, तर उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे.
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. त्यानंतर पावसाने दडी मारली, जुलै अखेरीस पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे धरणात पाणी जमा होऊ लागले. तसेच शेतीला पाणी मिळाले. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते सप्टेंबर तिसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारली. काही तालुक्यांमध्ये सलग 20 ते 30 दिवस पाऊस पडला नाही. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा चांगला पाऊस झाला.
त्यामुळे धरणे भरली. पण, आता पुणे शहरासह शेतीसाठी आवर्तने, बाष्पीभवन, काही ग्रामपंचायती आदींचा विचार करून पाण्याचे नियोजन आतापासून करण्याची गरज आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर शेती आणि उद्योग असा प्राधान्यक्रम ठरला आहे. प्रकल्पातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते.
कालवा समिती बैठकीकडे लक्ष
साधारणपणे ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी वाटपावर चर्चा होते. पालकमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असतात. दि. 15 ऑक्टोबरला धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेऊन वर्षभरासाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी नियोजन करण्यात येते. यामध्ये पुढील वर्षीच्या दि. 30 जुलैपर्यंतच पाणी वाटपाचे नियोजन होते. ग्रामीण भागाला पाणी सोडले तर शहराचे पाणी पळवले असा आरोप केला जातो.
शेती आणि पिण्यासाठी हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात येते. या बैठकीमध्ये पाणीवाटपावरून दरवर्षी ग्रामीण आणि शहरी असा वाद रंगतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे पाटबंधारे विभागापुढे आव्हान असणार आहे.