अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी : 675 कुटुंबांचे स्थलांतर
पुणे – धरणक्षेत्रामध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. 41 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीला पूर आला असून, शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. महापालिकेने सुमारे 675 कुटुंबांतील सुमारे 2 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. रात्रीही 45 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केल्याने हा खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.
सिंहगड रस्त्यावरील काही सोसायट्या, विठ्ठलवाडी, पुलाचीवाडी, रजपूत वीट भट्टी, खिलारेवाडी, औंध, बाणेर, पाटीलइस्टेट, येरवडा, शांतीनगर, ताडीवाला रस्ता हा परिसर जलमय झाला आहे. नागरिकांना महापालिका प्रशासनाने शाळांमध्ये स्थलांतरीत केले असून, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे शहराच्या परिसरात असणारी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे काठोकाठ भरली आहे. यामधून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. खडकवासला धरणातून 41 हजार 624, पानशेतमधून 12 हजार 434 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या भागात पूरपस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून, एनडीआरएफचे पथकही मागवण्यात आले आहे.
सतर्कतेचा इशारा
नदीला पूर आल्यामुळे नाल्यांमधील पाण्याची पातळीदेखील वाढली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या झोपडपट्टी आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. पाण्याची पातळी आणखी वाढणार असल्याने, या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या परिसरात पाणी शिरले आहे. त्यामुळे याठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, महापालिकेचा आरोग्य, आपत्तीव्यवस्थापन आणि अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले असून, आवश्यक त्या ठिकाणी काम करत आहेत.
– मुक्ता टिळक, महापौर.