तरडोली ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक : आश्वासनानंतर वातावरण शांत
मोरगाव – बारामती तालुक्यातील तरडोली येथील ग्रामसभा खडाजंगीमध्ये पार पडली. पिण्याचे पाणी वेळेवर सुटत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. मात्र, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच व पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर सभेत विविध विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी सरपंच विद्या भापकर, उपसरपंच सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जगदाळे, महेंद्र तांबे, अश्विनी गाडे, संतोष चौधरी, स्वाती गायकवाड, ग्रामसेवीका रुपाली मेहेत्रे, गाव कामगार तलाठी श्याम झोडगे, कृषी सहाय्यक प्रसाद तावरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार, पोलीस पाटील बाळासाहेब भापकर, दिनेश भोसले, भालेराव भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
येथील पाणी पुरवठा विहीरीवरील मोटार गेल्या आठ दहा दिवसांपासून नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांकडून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला. पाझर तलावाकाठी असलेल्या विहीरीवर नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सध्या असलेल्या तुटपुंज्या पाण्यामुळे पाणी कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचनचे पाणी पाझर तलावात सोडण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने पन्नास हजार रुपये देण्याचा ठराव ग्रामसभेने बहुमताने संमत केला.
सुरुवातीला गणपूर्तीअभावी सभा तहकुब करण्याचे ठरत असताना बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित झाल्याने ग्रामसभा घेण्याचे ठरले. सुरवातीला विविध प्रश्नांवर खडाजंगीत सुरु असलेली सभानंतर खेळीमेळीत संपन्न झाली. यामध्ये मागील विषय वाचुन कायम करणे, अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव तरतूद करण्याचे ठरविले. तसेच बिअरबार परवान्यासाठी ना हरकत दाखला केवळ गावातील व्यक्तीला द्यायचे ठरले. बिअरबारसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी दोन लाख रुपये ग्रामनिधी घेण्याचे ग्रामसभेने मंजुरी दिली.