Latur Rain Update – राज्यातील अनेक भागांत मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यावेळी लातूरमधील चाकूर तालुक्यात अंगावर वीज पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला.
एकिकडे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असताना दुसरीकडे 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्ह्यात एकाच महिन्यात तीन वेळा अवकाळी पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यात चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रबी हंगामातील पिकांची काढणी झाल्याने धोका टळला असला तरी आंबा फळपिकासह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वीज कोसळून 13 जनावरे दगावली आहेत.
लातूरमधील चाकूर तालुक्यात अंगावर वीज पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. नळेगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने सार्थक संतोष ढोले (21) हा जखमी झाला होता.
त्यानंतर उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी सार्थकला मृत घोषित केले. तसेच, मंगलाताई अशोकराव पाटील (65) यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.