पुणे – तृतीयपंथी सारिकाचा खून करणाऱ्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पैसा आणि शरीरसंबंधातून वाद झाल्यावर हा खून करण्यात आला. आरोपी हा पीओपीचे काम करतो. ही घटना कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाच्या जंगलात मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
सागर उर्फ सारिका उजागरे (वय 23) असे खून झालेल्या तृतीयपंथीयांचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर उर्फ सारिका याचा दरी पुलाजवळील टेकडीवर जाण्याच्या रस्त्यावर झाडात मृतदेह टाकण्यात आला होता. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासणी करत असताना तो तृतीयपंथी असल्याचे दिसून आले. मृताची ओळख पटल्यावर पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली होती. दरम्यान तांत्रीक तपासामध्ये आरोपीचा माग काढून अटक करण्यात आली. सागर उर्फ सारिका खेड शिवापूर टोल नाक्यावर पैसे मागून उदरनिर्वाह करते. ती दरी पुलाजवळ कशी आली त्याची माहिती पोलीस घेत आहेत.