पुणे -जिल्ह्यात तब्बल 91 हजार 948 विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी केली नाही. तर, 4 लाख 22 हजार 821 विद्यार्थ्यांच्या आधारचा डेटा जुळलेला नसल्याचे समोर आले आहे. आता शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघा महिना शिल्लक असून, कासवगतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.
पुणे जिल्ह्यात 19 लाख 60 हजार 500 विद्यार्थी असून यातील 18 लाख 68 हजार 552 विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली आहे. हे प्रमाण जवळपास 78 टक्के आहे. त्यामुळे आणखी 22 टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आरटीई प्रवेश, पोषण आहार, पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप यांसह अन्य योजनांचा पारदर्शकपणे लाभ देता यावा, यासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करावीच लागते. राज्यातही आतापर्यंत 22.59 टक्के काम बाकी आहे. प्रामुख्याने स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यातील 3 लाख 93 हजार विद्यार्थ्यांनी आधार कार्डच काढले नसून, 48 लाख विद्यार्थ्यांचा आधारबाबतचा डेटा अजूनही जुळत नसल्याची उघडकीस आले आहे.
पटसंख्येत भानगडी अन् अनुदान लूट
विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत भानगडी करुन योजनांचा निधी लाटण्याचे प्रकारही पूर्वी घटलेले आहेत. या प्रकारांना कायमस्वरुपी चाप बसावा, यासाठीच विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अपडेशन केले जाते. विद्यार्थी संख्येवर आधारित शिक्षक, कर्मचाऱ्यांची पदनिश्चिती करण्यासाठी संचमान्यता करण्यात येत आहेत. पण, आधार नोंदणीबाबत असलेली अनास्था पाहता गैरप्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वच जिल्ह्यांत दुर्लक्ष
विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अपडेशनसाठी 30 एप्रिल मुदत होती. आता ती 15 मेपर्यंत करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागाने शाळांना “आधार अपडेशन’ही करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र, एकाही जिल्ह्याचे 100 टक्के काम पूर्ण झालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक 93.85 टक्के तर सर्वांत कमी मुंबई उपनगरात 50.77 टक्के कामकाज पूर्ण झालेले आहे.