शेवगाव – शेवगावच्या मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकापासून जैन गल्ली, मारवाड गल्ली परिसरात अनेक छोट्या-मोठ्या व्यापारी-उद्योजकांनी उभारलेल्या विविध व्यावसायिकांच्या मोठमोठ्या वास्तूंमुळे परिसराच्या वैभवात भर पडली. या परिसरात कायम मोठी वर्दळ व रहदारी असते. शहराचा मध्यवर्ती आणि मोक्याचा भाग असून देखील नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चौकातून जाणाऱ्या जलवाहिन्या फुटल्या आहेत.
दहा-बारा दिवसांतून नळाला पाणी सुटल्यानंतर ते थेट बाजारपेठेत वाट फुटेल तिकडे वाहत सुटते. ठिकठिकाणी पाणी साचते, चिखल होतो. रस्त्यावरून पायी चालणेदेखील अवघड होते. अनेक ठिकाणी अस्ताव्यस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होऊन मनःस्ताप सहन करण्याची वेळ आल्याच्या तक्रारी आहेत.
नगर परिषदेने याबाबत तातडीने लक्ष घालून रस्त्याची डागडुजी करावी, वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा, यासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेऊन जनतेला न्याय देण्याची मागणी होत आहे. याबाबत दुर्लक्ष झाल्यास प्रसंगी जनआंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.