पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – देशातील उच्च शिक्षणसंस्थेत अग्रभागी असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एकत्र आल्या आहेत. त्यामुळेच देशातील २३ आयआयटींमध्ये पर्यावरण बचावाची नेट झिरो ही मोठी चळवळ सुरू होणार आहे. यासाठी ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डाॅ. राजेंद्र शेंडे यांनी पुढाकार घेतला आहे.
इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात नामांकीत असलेल्या आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे असंख्य युवकांचे स्वप्न असते. अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये शिक्षणाची संधी मिळते. त्याचे सोने करून हे विद्यार्थी पुढे भारताचे नाव जगभरात गाजवतात. त्यामुळेच आयआयटीचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत नेतृत्व करताना दिसत आहेत.
आता या सर्व आयआयटी एका कारणासाठी एकवटणार आहेत. हवामान बदल, जागतिक तपमानवाढ या वैश्विक समस्यांना रोखण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतातील २३ आयआयटी नेट झिरो या मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत.
ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. शेंडे हे मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत, तसेच त्यांच्या नेतृत्वात ग्रीन तेर फाउंडेशन कार्यरत आहे. याच संस्थेच्या वतीने गुवाहाटी आयआयटीमध्ये नेट झिरो ही कार्यशाळा संचालक डॉ. राजीव आहुजा आणि माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
आयआयटीमध्ये नेमके काय घडणार
हवामान बदलाच्या समस्येला थोपविण्यासाठी कार्बन न्यूट्रलशिवाय अन्य पर्याय नाही. नेट झिरो म्हणजेच कार्बन उत्सर्जन शून्य करणे. आयआयटीच्या कॅम्पसमध्ये जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी अत्यंत कसोशीचा अभ्यास करून कृती आराखडा तयार केला जाईल.
त्यानंतर उद्दिष्ट निश्चित केले जाईल आणि प्रत्यक्ष कृती केली जाईल. वृक्षारोपण, कचऱ्याची निर्मिती न होणे, झाला तरी त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, प्रदूषण होणार नाही, अशा तंत्रज्ञान आणि बाबींचा अंगीकार करणे, वस्तूंचा पुनर्वापर, सौरऊर्जा निर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन यासह अनेक संकल्पनांचा अवलंब केला जाणार आहे.
हवामान बदल आणि जागतिक तपमानवाढीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी पर्यावरणस्नेही कृती असणारी नेट झिरो ही मोहीम अत्यावश्यक आहे. देशातील शेकडो विद्यापीठे आणि हजारो कॉलेजेसमध्ये नेट झिरोचे जाळे विकसित झाले आहे. आता देशातील २३ आयआयटीही नेट झिरोसाठी पुढाकार घेत आहेत. ही जगभरातील उच्च शिक्षणसंस्थांसाठी प्रेरणादायक बाब आहे. – डॉ. राजेंद्र शेंडे, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ