पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, वांगी आणि शिमला मिरचीच्या भावात वाढ झाली असून, लसणाच्या भावात घट झाली आहे, तर इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़. येथे रविवारी (दि. २५) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ते ११० ट्रक इतकी फळभाज्यांची आवक झाली.
मेथी, शेपू, कांदापात, करडई, पुदिना, अंबाडी, राजगिरा, चुका, चवळई आणि हरभरागड्डीच्या भावात वाढ झाली असून, कोथिंबीर, चाकवत, मुळा आणि पालकचे भाव स्थिर होते. उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा फटका भाज्यांना बसत असल्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. परिणामी आवक कमी होत असल्याने दरात वाढ होताना दिसत आहे.
बाजारात गुजरात आणि कर्नाटकातून येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, आंध्रप्रदेश- तमिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ९ ते १० टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा ४ ते ५ टेम्पो, राजस्थान येथून ९ ते १० ट्रक मटार, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो पावटा, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे १३ ते १४ टेम्पो इतकी आवक झाली होती, तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ६०० ते ७०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, टोमॅटो सुमारे १० ते ११ हजार क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो.
फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ९ ते १० टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, घेवडा ५ ते ६ टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो इतकी आवक झाली होती
तर पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू, कांदापात, करडई, पुदिना, अंबाडी, राजगिरा, चुका, चवळई आणि हरभरागड्डीच्या भावात वाढ झाली असून, कोथिंबीर, चाकवत, मुळा आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबीरीची दीड लाख जुडी, तर मेथीची ७० हजार जुडींची आवक झाली असून, उन्हाळा वाढू लागल्याने बहुतांश पालेभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे़
रसाळ फळांच्या मागणीत वाढ
शहरात मागील काही दिवसांत उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. यामुळे हॉटेल आणि ज्यूस सेंटरकडून फळांना मोठी मागणी वाढली आहे, तसेच घरगुती ग्राहकही फळांच्या खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. यामुळे संत्री, मोसंबी, कलिंगड, खरबूज, द्राक्ष, स्ट्रॉबेरी अशा रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीत वाढ झाल्याने त्यांचे दरही टिकून आहेत. फळबाजारात रविवारी (दि़. २५) खरबुजाच्या भावात वाढ झाली असून, लिंबांच्या भावात घट झाली आहे,
तर अननस, चिक्कू, पेरू, पपई, डाळिंब, संत्री, मोसंबी आणि सफरचंदाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़. मार्केट यार्डमध्ये रविवारी केरळ येथून अननस ७ ट्रक, मोसंबी २० ते ३० टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबांची सुमारे एक हजार ते दीड हजार गोणी, कलिंगड २० ते २५ टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स, सफरचंद ८०० ते १ हजार बॉक्स इतकी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
बंदमुळे फुलंच्या दरात मोठी घसरण
बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र, मागणी कमी असल्याने सुट्या फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. शोभिवंत फुलांचे भाव टिकून होते. कामगारांचा बंद असल्याचाही फटका फूल बाजाराला बसला आहे.
मासळी तेजीत
गणेश पेठ येथील मासळी बाजारात दाखल होत असलेल्या मासळीच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने सर्व प्रकारच्या मासळीचे दर तेजीत होते. मागील आठवड्यातही हे दर टिकून होते. परराज्यातून खरेदी वाढल्याने स्थानिक बाजारात चिकनच्या भावात किलोमागे आणखी काही रुपयांनी वाढ झाली आहे. इंग्लिश अंड्यांच्या मागणीत घट झाल्याने भावात शेकड्यामागे ३५ रुपयांनी घसरण झाली.
मागणी इतकाच पुरवठा होत असल्याने गावरान अंडी व मटणाचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते.
रविवारी बाजारात खोल समुद्रातील मासळी १५ टन, खाडीच्या मासळीची २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० ते ८०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.