प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 – सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करेल तयांचे..! तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, या संत शिकवणुकीनुसार भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी, स्वातंत्र्य चळवळीस ईश्वरी-रूपी, विवेकाचे अधिष्ठान मिळण्यासाठी जुलमी राजकर्ते इंग्रजांविरोधी जनआंदोलनाचा रेटा तीव्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी भारतीय जनतेस “सार्वजनिक गणेशोत्सवाची’ प्रेरणा दिली. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते व जननायक हे लोकमान्य टिळक आहेत, असे विचार संत साहित्य अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मांडले.
सदाशिव पेठेतील नवजवान मित्र मंडळाच्या “सुवर्ण महेत्सवी’ वर्षाच्या “श्रीं’च्या प्राणप्रतिष्ठा स्थापनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी विरोधीपक्ष नेते त्र्यंबक आपटे, मंडई मंडळाचे कार्याध्यक्ष भोला वांजळे व नवजवान मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत केळुस्कर, मंडळाचे कार्याघ्यक्ष बाबा कंधारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कंधारे यांनी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. तसेच, गणेशोत्सवातील आठवणींचा उहापोह केला. यावेळी आशुतोष धोडमिसे, बाळासाहेब केळुसकर, कैलास गुप्ता, संदीप कोकाटे, अभय केसकर, गुरुदेव कोकाटे, मिलिंद माने, नचिकेत बेरी, संजय जाधव, सिद्धेश जाधव, आदित्य राऊत, प्रसाद गाढवे, आदित्य खोपडेसह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.