लाहोर – पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाने पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडण्यासाठी प्रांतीय विधीमंडळाचे समांतर अधिवेशन भरवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रांतीय विधीमंडळामध्ये आपल्या पक्षाला महिला आणि अल्पसंख्यांच्या आरक्षित जागा धरून २५० जागांचे बहुमत असल्याचा दावाही पक्षाने केला आहे. पीटीआयचे नेते शौकत बसरा यांनी पत्रकार परिषदेमध्ये या समांतर अधिवेशनाची माहिती दिली.
फॉर्म-४५ नुसार जे उमेदवार विजयी झाले आहेत, ते या अधिवेशनामध्ये सहभागी होतील. याशिवाय पीटीआयच्या पाठिंब्यावर पंजाब प्रांताची निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार देखील या अधिवेशनामध्ये सहभागी होतील.
पंजाबच्या मुख्यमंत्री म्हणून निवडल्या गेलेल्या मरियम नवाझ यांनी जनादेश चोरला असल्याच्या आरोपाचा बसरा यांनी पुनरुच्चार केला.
मेहर सराफत या पीटीआयच्या पाठिंब्यावरील उमेदवाराने नवाझ शरीफ यांचा पराभव केला होता.
मात्र निवडणूक आयोगाने गैरप्रकार करून शरीफ यांना विजयी केले असा आरोपही त्यांनी केला. अशीच आणखीन काही उदाहरणेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. चोरलेल्या जनादेशाच्या आधारे बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या सरकारच्या भविष्याबाबत अनिश्चितता आहे, असेही ते म्हणाले.
पीटीआयने पंजाब प्रांतात समांतर अधिवेशन घेण्याचे ठरवल्यामुळे प्रांतीय निवडणुकीत गैरप्रकारांचे आरोप अधोरेखित केले गेले आहेत. यामुळे प्रांतात राजकीय तणाव कायम राहण्याची चिन्हे आहेत.