सातारा – राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झालेली असताना दरवर्षी टोलमध्ये भरमसाठ वाढ करण्यात येत आहे. महामार्गाची दुरुस्ती करुन आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध न केल्यास महामार्गावरील टोल नाके बंद करु, असा आक्रमक इशारा खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे व समिती सदस्यांनी दिशा समितीच्या सभेत दिला.
याबाबत लवकरच महामार्ग प्राधिकरणाने दिशा समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांच्यासमवेत बैठकीचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी दिशा समितीची बैठक खा. श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महामार्ग प्राधिकरणाच्या आढावा अंकित यादव यांनी सादर केला. या चर्चेदरम्यान महामार्गावरील गैरसोयींचा पाढा खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, किरण साबळे- पाटील, ऍड. विनित पाटील यांच्यासह सदस्यांनी वाचला.
महामार्गांची दुरावस्था झाली असून सेवा रस्त्यांवर पाणी साठत आहे. उड्डाण पुलांखाली घाणीचे साम्राज्य आहे. महामार्गावर रिलायन्स कंपनीने गरजेच्या सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. सोयी सुविधांचा अभाव असतानाही दरवर्षी मात्र टोल दरवाढ केली जात आहे. महामार्गाची दुरुस्ती करुन सोयीसुविधा पुरवल्या नाहीत तर टोलनाके बंद करु, असा इशारा खा. पाटील, आ. शिंदे व सदस्यांनी दिला. सातारा – लोणंद रस्त्याबाबतही खा. श्रीनिवास पाटील व किरण साबळे- पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.
या रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, “”महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे की काय? सातारा जिल्हा राज्यात एकमेव असेल ज्याठिकाणी तीन टोलची आकारणी होत आहे. जिल्ह्यातील जनतेने फक्त टोलचे पैसेच भरत बसायचे का? यापुढे जर सोयी सुविधा मिळणार नसतील तर टोलनाके बंद पाडले जातील.” महामार्गाबाबतच्या तक्रारींवरुन जितेंद्र डुडी यांनीही नाराजी व्यक्त केली. बैठकीत चर्चा होतात मात्र त्यावर महामार्ग प्राधिकरण पुढे काही करत नाही. ही बाब गंभीर असून यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही. महामार्गावरील वाढते अपघात कमी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना करावी. दिशा समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांच्या उपस्थितीत महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी, अशा सूचना जितेंद्र डुडी यांनी केल्या.
जिल्हा उपनिबंधकांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
दिशा समिती सभेस अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित राहत नाहीत. काही अधिकारी प्रतिनिधी पाठवतात ही बाब गंभीर असल्याचे मत खा. श्रीनिवास पाटील व अन्य सदस्यांनी व्यक्त केले. या सभेस जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी अनुपस्थित असल्याने त्यांचे प्रतिनिधी हजर होते. वास्तविक माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुणे येथील बैठकीस जाणे उचित होते. मात्र, परवानगी न घेता माळी सभेस गैरहजर राहिल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नाराजी व्यक्त केली. माळी यांना नोटीस काढण्याचे आदेश श्री. डुडी यांनी दिले.