ग्रामस्थांकडून वीज कार्यालयाला निवेदन ः सर्पदंशाच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण
केडगाव -शेतकऱ्यांना सध्या शेतीसाठी देण्यात येणारी वीज दिवसा देण्यात यावी, या मागणीसाठी केडगाव (ता. दौंड) वीज कार्यालयाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके आणि संजय माळपे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना दौंड शाखेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
महावितरण कंपनीच्या केडगाव कार्यालयाकडून परिसरातील शेतकऱ्यांना वीजपंपासाठी दिवसा पावणेआठपासून दुपारी पावणेचारपर्यंत आणि रात्री 8 वाजून 25 पासून सकाळी 6 वाजून 25 पर्यंत वीजपुरवठा दोन टप्प्यात करण्यात येतो. दिवसा होणारा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी सुरळीत असला तरी रात्रीचा पुरवठा अडचणीचा ठरत आहे. रात्री-अपरात्री वीज येत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून शेतीत राबावे लागत आहे.
सध्या रब्बी हंगामातील मुख्य पीक असणाऱ्या गहू आणि हरभरा पिकांच्या लागवडीचा काळ आहे, त्यामुळे या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका संभवतो. अनेक ठिकाणी सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. शिवाय मागील काही दिवसापासून परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी भयभीत आहेत, त्यामुळे रात्री करण्यात येणारा वीजपंपासाठीचा वीजपुरवठा सलग दिवसा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दौंड तालुका उपाध्यक्ष संजय धायगुडे, शिवसेना तालुका अध्यक्ष देवीदास दिवेकर, विक्रम पवार, जालिंदर धायगुडे, मच्छिंद्र धायगुडे, अमोल धायगुडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.