पाण्याचा दर्जा चिंताजनक : सुपीक शेतीची नासाडी होणार, जलचरांना धोका
भिगवण – उजनी धरणातील पाणीसाठा अनेक कारणांमुळे दूषित बनला असून, येथील जीवसृष्टी धोक्यात आली आहे.
पुणे आणि परिसरातून औद्योगिक क्षेत्रातील टाकाऊ रसायने व नागरी मैलापाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते. मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी आदी नद्यांतून हे पाणी भीमेला येऊन मिळते. उजनी धरणात हेच पाणी साठते. या पाण्यात अनेक विद्राव्य घटक मिसळले आहे, त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. पाणवनस्पती सडण्याची प्रक्रिया होत आहे. मासे, सर्व जलचर, पाणपक्षी आणि लगतचे पर्यावरण धोक्यात आले आहे. उजनीकाठी पाण्यात पाय ठेवल्यास त्वचेवर देखील परिणाम होतो आहे.
पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांतील अनेक गावांना उजनीचे पाणी पिण्यासाठी, तसेच शेतीसाठी पुरविले जाते. तज्ज्ञांच्या मतानुसार पाण्यातील रासायनिक घटक अगदी आरओ सिस्टीमचे पाणी फिल्टर वापरूनही दूर करता येतील, याची शाश्वती नाही. या पाण्यातील प्रदूषणाचे रसायनयुक्त घटक जलचर आणि पाणवनस्पतींच्या शरीरात आढळून आले आहेत. प्रदूषणामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटल्याने अशा पाण्यात जलचर राहू शकत नाहीत. उजनी हे देशी-परदेशी पक्ष्यांचे नंदनवन मानले जाते.
चित्रबलाक, राखाडी बगळा, पाणकावळा, थापट्या बदक आदी देशी तर अग्निपंख, पट्टकदम, मासेमार गरूड यांसारखे परदेशी पक्षी येथे येतात. या पक्ष्यांच्या अस्तित्वास प्रदूषणाचा धोका पोहोचला आहे. उजनीच्या पाण्यात पूर्वी रोहू, कटला, मरळ, वाम, चांभारी आदी स्थानिक पर्यावरणात असणारे मासे मोठ्या प्रमाणात सापडत होते. आता मासेमारी तंत्र सुधारूनसुद्धा हे मासे कमी आढळत आहेत. स्थानिक नसलेल्या चिलापी माशांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाण्यातील प्राणवायूचे घटते प्रमाण माशांच्या जीवावर उठले आहे. पाण्यास गर्द हिरवा रंग प्राप्त झाला आहे. त्यामुळे एकूणच येथील उजनीचे पर्यावरण धोक्यात आले आहे.
दुर्धर आजार बळावले…
उजनीच्या पाण्यातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. सामाजिक संस्था पर्यावरण रक्षणासाठी झटत असताना राजकारणी आणि उद्योजक मूग गिळून गप्प आहेत. इंदापूरचे राज्यकर्ते यावर आवाज उठवित नाहीत, असा सूर नागरिकांतून आळवला जात आहे. उजनीतील प्रदूषित पाण्यामुळे कर्करोग, मूतखडा, पोटाच्या तक्रारी, हाडांची ठिसुळता वाढणे आदी आजार बळावले आहेत. बारामती, इंदापूर, अकलूज येथील मोठे दवाखाने, औषधोपचार आणि उपचार खर्चाच्या योजना येत आहेत. प्रदूषित पाण्याचे वास्तव लक्षात घ्यायला वेळ कोणाकडे आहे, अगदी शासनदरबारीसुद्धा या समस्यांची कितपत जाणीव आहे, हा मोठाच प्रश्न आहे.
शासनाने उजनीच्या पाण्याचा विषय नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असून यांनी घातक आजार, साथीचे आजार वाढले आहेत. उजनी परिसंस्था आणि परिसरातील मानवी जीवन तीव्रतेने बाधित होण्याआधी शासनाने दूषित पाण्याचा विषय गांभिर्याने घ्यावा.
– संजय चौधरी, अध्यक्ष, नेचर फाउंडेशन, भिगवण.