पानिपत – कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आपली निदर्शने रविवारी आणखी तीव्र केली. जोपर्यंत केंद्र सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत हरियाणात टोलमुक्त वाहतूक करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे.
सुरवातीला शेतकऱ्यांनी 25 ते 27 डिसेंबर टोलमुक्त प्रवास अशी घोषणा केली होती. मात्र टोल नाक्यांवर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी जमा होत असल्याने हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
हरियाणा भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनामसिंग चदुनी म्हणाले, आज आम्ही अनेक टोल नाक्यांवर गेलो. त्यावेळी सामान्य नागरिकांनी हे टोल नाके कायम स्वरूपी बंद व्हावेत अशी इच्छा व्याक्त केली.
त्यामुळे आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत टोल प्लाझामुक्त वाहतूक हे आंदोलन करणार आहोत. टोल नाक्यांवर सुरळीतपणे आंदोलन करण्यासाठी समिती नेमणार आहोत. त्यात पाच ते पंधराजण टोल नाक्यांवर जातील आणि गरज भासल्यास अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.
चदुनी यांनी रोहतक पानिपत मार्गावरील मकडोली टोल नाक्यांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे शेतकरी तेथे तीन दिवसांपासून निदर्शने करत होते. राज्य सरकारला पाठींबा देणाऱ्या जेपीपी पक्षाच्या नेत्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांना शेतकऱ्यांनी रविवारी घेराव घातला. भाजपाच्या नेत्यांनाही अशा निदर्शनांना सामोरे जावे लागले.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या मतदार संघात आज होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध करण्याची रणनिती ठरवण्यासाठी शेतकरी नेत्यांनी भीवनी येथे काल शनिवारी बैठक घेतली होती. मात्र खट्टर यांनी चौधरी बन्सीलाल विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमाकडे टाळले. या कार्यक्रमात त्यांनी ऑनलाइन सहभाग घेतला.
विद्यापीठातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या निदर्शनामुळे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले नाहीत तर मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र हा कार्यक्रम ऑनलाईन करण्याचेच प्रस्तावित होते. खट्टर यांना अलिकडेच अंबाला येथे शेतकऱ्यांच्या तीव्र निदर्शनांचा सामना करावा लागला. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले.