नवी दिल्ली – केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयकांवरील भूमिका अधिक कठोर केल्यानंतर या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी थाळ्या वाजवून या निर्णयाचा निषेध केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून “मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत असतानाच सिंघू आणि गाझिपूरच्या सीमांवर धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी थाळ्या वाजवून पंतप्रधानांच्या संबोधनाचा निषेध केला.
पंतप्रधानांचे “मन की बात’ ऐकत असताना “आमचीही मन की बात ऐका’ अशी घोषणाबाजीही शेतकऱ्यांनी यावेळी केली. करोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद देण्यासाठी पंतप्रधानांनी अशाच प्रकारे थाळी नाद करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांनी आज थाळी नाद केला.
पंतप्रधानांच्या “मन की बात’ कार्यक्रमाच्या वेळी थाळ्या वाजवून या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे आवाहन शेतकऱ्यांच्या नेत्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच नागरिकांना केले होते. स्वराज इंडिया संघटनेचे नेते योगेंद्र यादव यांनीही शेतकऱ्यांना “मन की बात’च्यावेळी थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. “तुमची “मन की बात’ ऐकून शेतकरी कंटाळले आहेत.
आता तुम्ही आमची “मन की बात’ कधी ऐकणार.’ असे यादव म्हणाले होते. “मन की बात’ नागरिकांच्या कानापर्यंत पोहोचू नये म्हणूनच त्या कार्यक्रमाच्यावेळी थाळ्या वाजवण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
शेतकरी आणि सरकार दरम्यान कृषी कायद्यासंदर्भातील चर्चेच्या पाच फेऱ्या होऊन गेल्या आहेत. मात्र त्यातून ठोस निष्कर्श निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांच्या आक्षेपांसंदर्भात तज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.