नाणे मावळ (वार्ताहर) – चैत्र पौर्णिमेनंतर गावागावातील जत्रा-यात्रांना सुरवात होते. नाणे मावळ व तालुक्यात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी लागणारे बैलगाडा वाहून नेला जात असून त्याची धोकादायक पद्घतीने वाहतूक केली जात आहे.
चैत्र महिना हा तसा जत्रा-यात्रांचा समजला जातो. या जत्रा आणि गाव यात्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात मनोरंजनापासून ते विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असतो. कुस्त्यांचा आखाडा, बैलगाडा शर्यत या मर्दानी खेळांचा प्रामुख्याने समावेश असतो. त्यासाठी मोठी बक्षिसे ठेवली जातात.
तसेच या यात्रांमध्ये पटकविलेली बक्षिसे ही मानाची समजली जातात. बैलगाडा शर्यत तर, शेतकऱयांसाठी नावाजलेला खेळ आहे. या खेळासाठी लागणारा बैल गाडा टेम्पोच्या टपावर घेऊन जात आहेत. त्याने अपघाताचा मोठा धोका होऊ शकतो.
कामशेत रेल्वे गेट परिसरात असे मोठे बैलगाडे वाहनाच्या टपावर ठेवून जीवघेणा प्रवास करताना परिसरातील नागरिक दिसत आहेत. त्यामुळे बैलगाडा वाहून नेताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.