Mamata Banerjee – भाजपच्या विरोधात असणाऱ्या पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी योग्य जागावाटप होणे गरजेचे आहे. तसे पाऊल भाजपला केंद्राची सत्ता राखण्यापासून रोखेल, अशी भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee) यांनी मांडली. विधानसभेत बोलताना ममतांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण केले.
त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. मताधिक्य अतिशय कमी असल्याने भाजपने अतिशय आनंदी होऊ नये. इतर पक्षांच्या मतांमध्ये विभाजन झाल्याने भाजपला राजस्थानात कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या.
कॉंग्रेसने इतर पक्षांशी हातमिळवणी करायला हवी होती. जनतेचा नव्हे; तर कॉंग्रेसचा चुकीच्या धोरणांमुळे पराभव झाला. अनुभवांतून धडा शिकायला हवा. रणनीती निश्चित करावी लागेल. विरोधी पक्षांची इंडिया ही आघाडी एकत्रितपणे कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.