नवी दिल्ली – भारत झपाट्याने विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. 1980-81 मध्ये भारताची अर्थव्यवस्था केवळ 189 अब्ज डॉलरची होती. ती अर्थव्यवस्था आता 3.7 लाख कोटी डॉलरची म्हणजे 3,700 अब्ज डॉलरची झाली आहे. विविध मूल्यांकन करणार्या संस्थांच्या अंदाजानुसार 2027 – 28 मध्ये भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरची होईल असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांना वाटते.
आज संसदेत या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौधरी यांनी सांगितले की. 1990 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 326 अब्ज डॉलरची तर 2001 मध्ये 476 अब्ज डॉलरची होती. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. 2011 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 1.71 लाख कोटी डॉलरची झाली. तर 2021 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.67 लाख कोटीची झाली. आता ही अर्थव्यवस्था 3.7 लाख कोटीची आहे. केवळ तीन वर्षात म्हणजे 2027- 28 मध्ये भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरची होईल असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
या गतीने भारताचा विकास झाला तर 2047 मध्ये भारताची अर्थव्यवस्था निश्चितपणे 25 लाख कोटी डॉलरची होऊ शकेल. त्यावेळी भारत विकसित देश झालेला असेल असे चौधरी यांना वाटते. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढावी यासाठी केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी या कालखंडामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
करोनाच्या काळात गरिबांना मदत करूनही सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक चालूच ठेवली. आता खासगी क्षेत्राने या क्षेत्रात गुंतवणूक करावी यासाठी सरकार उपाययोजना करीत आहे. याच काळात जनतेची मानसिकता विकसित भारताच्या दृष्टिकोनातून तयार व्हावी यासाठी प्रचार मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवा क्षेत्राचा वाटा जास्त
सध्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा वाटा तब्बल 53.3% आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग आणि उद्योग क्षेत्राचा वाटा 28.3% आहे. अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचा वाटा 18.4 टक्के आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.