मुंबई – बळकट स्थूल अर्थव्यवस्था, भाजपाच्या दृष्टिकोनातून अनुकूल राजकीय परिस्थिती, परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून वाढलेली गुंतवणूक, व्याजदरात वाढ होण्याची कमी शक्यता या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी खरेदी वाढली. सध्या भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर घोडदौड करीत असल्याचे वातावरण आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 431 अंकांनी वाढून 69,296 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 168 अंकांनी वाढून 20,855 अंकावर बंद झाला. शेअर बाजारात सध्या कमालीचे सकारात्मक वातावरण आहे. परदेशी बाजारात विक्रीचे वारे असूनही भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी चालू आहे. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य सध्या 345 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. हे बाजार मूल्य राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त झाल्यानंतर गुंतवणूकदार सावध होऊन व्यवहार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 374 लाख कोटी रुपये आहे.
घडामोडी बाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, धातू, बँकिंग, तेल आणि नैसर्गिक वायू, ग्राहक वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचबरोबर अमेरिकेतील एका चौकशी संस्थेने अदानी समूहावरील हिंडेनबर्गचे आरोप संदर्भहीन आहेत असे म्हटल्याचे वृत्तसंस्थांनी जाहीर केल्यानंतर आज पुन्हा या समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनात कपात जाहीर करूनही जागतिक मंदीमुळे तेलाचे दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत. या घडामोडीचा भारतीय शेअर बाजारांना फायदा होत आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे पतधोरण या आठवड्यात जाहीर होणार आहे. एकूण परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँक व्याजदर वाढीच्या शक्यतेवर विचारही करणार नाही असे एकूण वातावरण आहे.
परदेशी गुंतवणूक वाढली
त्याचबरोबर परदेशी संस्थेत गुंतवणूकदारांनी काल 2,013 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. एवढेच नाही तर गेल्या आठ सत्रात या गुंतवणूकदारांनी 17,133 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. आज संध्याकाळी अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधारावर गुंतवणूकदार पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे.