नवी दिल्ली : मागील काही दिवसापूर्वी हरियाणाच्या नूह जिल्ह्यात निवणुकीदरम्यान हिंसा उसळून दंगल झाली होती. दरम्यान, तेंव्हापासून याठिकाणचे वातावरणही स्थिर झाले नाही. अशी परिस्थिती असताना हिंदू महापंचायतकडून पुन्हा एकदा बृजमंडल शोभा यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर नूह आणि इतर काही भागांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,”पोलिस आणि प्रशासनाने मिरवणुकसाठी परवानगी दिलेली नाही, तरी देखील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न यासाठी पोलिस खबरदारी घेत असून सर्वत्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, निमसैनिक दल आणि सुरक्षा कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. आंतरराज्य आणि आंतर जिल्हा सीमांवर पोलिसांनी सुरक्षा कडक केली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने सोमवारी शैक्षणिक संस्था आणि बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने मोबाईल इंटरनेट आणि बल्क संदेश (एकदाच अनेकांना मेसेज करणे) सेवा बंद केली आहे. अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे चारपेक्षा अधिक लोक एकाठिकाणी जमा होण्यास बंदी आहे.
#WATCH | Haryana | Security tightened in Nuh and surrounding areas in view of Vishwa Hindu Parishad’s (VHP) call for ‘Yatra’.
Visuals from Nuh-Gurugram border pic.twitter.com/6LotAGHTLE
— ANI (@ANI) August 28, 2023
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ३१ जुलै रोजी काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेकांना जीव गमावावा लागला. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि जीवितहानीच्या घटना घडल्या. जवळपास १० दिवस राज्यात वातावरण अशांत होते. हिंसाचारामुळे थांबवावी लागलेली मिरवणूक पुन्हा एकदा काढण्याचा निर्णय हिंदू संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे.
२८ तारखेला ही मिरवणूक काढली जात आहे. विशेष म्हणजे परवानगी नसताना ही मिरवणूक काढली जात आहे. या दिवशी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.त्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, यासाठी पोलिस खबरदारी घेत आहेत. व्यायसायिक कामासाठी वापरली जाणारे इंटरनेट सेवा सुरु असेल. २८ ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्यापासून काही सेवांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याविषयी माहिती देताना, ‘३१ जुलै रोजी थांबवावी लागलेली ब्रिज मंडल अभिषेक यात्रा पुन्हा सुरु करण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे.’ विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र जैन म्हणाले, ‘काहीही झालं तरी मिरवणूक काढली जाणारच. नियोजनानुसार मिरवणूक निघेल. तो आमचा अधिकार आहे. आमची सुरक्षा ही प्रशासन आणि पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं. आम्ही मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या नियंत्रित करु, पण यात्रा निघणारच.’ असल्याची माहिती दिली आहे.