नवी दिल्ली : राजस्थानच्या कोटामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोटामध्ये ६ तासां दोन विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोटा याठिकाणी नीट परीक्षेची तयारीसाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबताना दिसत नाही. वर्षभरात आतापर्यंत एकूण २४ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
महाराष्ट्राचा अविष्कार संभाजी कासले (१८) आणि बिहारचा आदर्श राज (१८) हे दोन विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करत होते. समोर आलेल्या माहितीनुसार, अविष्कारने परीक्षा दिल्यानंतर काही तासांत सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली होती.
अविष्कार कासले हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी आहे. अविष्कार NEET ची तयारी तीन वर्षांपासून करत होता. तालेवाडी येथे आजी-आजोबांसोबत तो किरायाच्या घरी राहात होता. त्याचे वडील महाराष्ट्रातील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. तर अविष्कारनंतर काही तासानंतर बिहारचा रहिवाशी असलेला आदार्श राज याने परीक्षा दिल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री सातच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळला. दाव्यानुसार, परीक्षेमध्ये कमी गुण मिळतील या भीतीने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सदर दोन्ही घटनांमुळे शहरामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत. जिल्हाधिकारी ओपी बुन्कर यांनी कोचिंग इन्सिट्यूटना पुढील दोन महिने परीक्षा न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्यांनी अँटी सुसाईड-उपकरणे खोलीत बसवण्याची सूचना कोचिंग इन्सिट्यूटला दिली आहे.