Priyanka Gandhi – मोदी सरकार (narendra modi) आणि भाजपचा फोकस केवळ सत्तेवर आहे. त्यांना जनतेच्या कल्याणाशी काही देणे-घेणे नाही. गरिबांच्या खिशांतून पैसे काढून घ्या आणि बड्या उद्योगपतींना द्या हे त्यांचे धोरण आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सोडले.
विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या राजस्थानात कॉंग्रेसची सभा झाली. त्यामध्ये बोलताना प्रियंका यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. निवडणुकांवेळी विकासाच्या मुद्द्यांऐवजी धर्म आणि जातीवर का बोलता असा प्रश्न जनतेनेच भाजप नेत्यांना विचारावा.
राजस्थानमध्ये भाजपची अवस्था विभाजन झालेल्या घरासारखी बनली आहे. त्या पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार कारणीभूत आहे. त्याउलट, कॉंग्रेसमध्ये एकजूट आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रियंका यांच्या सभेतून कॉंग्रेसने ऐक्याचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. त्या सभेला मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दोघेही उपस्थित होते.
गेहलोत आणि पायलट हे एकमेकांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्यातील सत्तासंघर्ष नेहमीच कॉंग्रेसची चिंता वाढवणारी बाब ठरली. मात्र, त्यांना निवडणूक काळात एकाच व्यासपीठावर आणण्यात पक्षाला यश मिळताना दिसत आहे.