नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील कॉंग्रेस सरकारवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे. जर २५ आमदार असलेला पक्ष ४३ आमदार असलेल्या पक्षाच्या बहुमताला आव्हान देत असेल तर त्यांची मदार आमदारांच्या खरेदी विक्रीवरच आहे हे स्पष्ट होते अशी टिप्पणी प्रियंका यांनी केली आहे.
भाजपचा हा प्रकार घटनाबाह्य आणि अनैतिक आहे. हिमाचल प्रदेश आणि संपूर्ण देशातील जनता हे पाहते आहे. हिमाचल प्रदेशावर जेंव्हा नैसर्गिक आपत्ती कोसळली तेंव्हा या राज्याच्या बाजूने भाजप उभी राहीली नाही आणि आता हा पक्ष या राज्याला पुन्हा राजकीय संकटात ढकलण्याचा प्रयत्न करतो आहे अशी टीका प्रियंका यांनी केली. त्या म्हणाल्या की लोकशाहीत नागरिकांना आपल्या पसंतीचे सरकार निवडण्याचा अधिकार आहे.
हिमाचलच्या जनतेने आपल्या याच अधिकाराचा वापर केला आणि स्पष्ट बहुमताने कॉंग्रेसचे सरकार निवडून दिले. मात्र भारतीय जनता पार्टी धनशक्ती, तपास संस्थांची ताकद आणि केंद्रातील आपल्या सत्तेचा दुरूपयोग करून हिमाचलच्या जनतेचा हा अधिकार चिरडण्याचा प्रयत्न करते आहे. भाजप ज्या प्रकारे सरकारी सुरक्षा आणि यंत्रणेचा उपयोग करत आहे ते पूर्वी कधीही घडले नाही.