हैदराबाद – लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातून आतापासूनच जनतेला साकडे घालण्याची लगबगही सुरू झाली आहे.
अशात तेलंगणामधील भाजपचे खासदार डी.अरविंद यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. भाजपला मतदान करा; अन्यथा नरकात जाल, असे अजब आवाहन ते व्हिडीओत करताना दिसतात.
तेलंगणात नुकतेच भाजपने विजय संकल्प यात्रेचे आयोजन केले होते. त्या यात्रेवेळी अरविंद यांनी एका मेळाव्यात भाषण केले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जनतेसाठी विविध योजना राबवत असल्याचे अधोरेखित केले.
बोलण्याच्या ओघात त्यांनी अप्रत्यक्षपणे जनतेला इशारा दिला. तुम्हाला मोफत अन्न, मोफत गॅस मिळत आहे. चांगल्या शाळांची उभारणी होत आहे. मोदी तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
त्यानंतरही तुम्ही कॉंग्रेस किंवा बीआरएसला मतदान केले तर देव तुम्हाला नरकात पाठवेल. तुम्ही स्वर्गात जाणार नाही. स्वर्गात जायचे असेल तर देशाला सेवा पुरवणाऱ्यांना आणि देश सुरक्षित ठेवणाऱ्यांना पाठिंबा द्या, असे अरविंद उपस्थितांना उद्देशून म्हणाले.