मुंबई – पक्षात कोणताही विषय उपस्थित करणे म्हणजे पक्षाच्या विरोधात बंड करणे असे होत नाही असे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केले आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षात चीनचे अतिक्रमण आणि आर्थिक क्षेत्रातील अपयश असे विषय पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थित करण्याचे धाडस दाखवावे अशी उपरोधिक सुचनाही त्यांनी केली आहे.
पीटीआयशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की कॉंग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाहीं आहे याची जाणिवही लोकांना झाली आहे.
23 मंत्र्यांनी पक्षाध्यक्षांना जे पत्र पाठवले आहे त्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना गाडगीळ यांनी हे प्रतिपादन केले. कॉंग्रेस सारखी पक्षांतर्गत लोकशाहीं भाजपमध्ये असेल तर त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वापुढे चीनचे अतिक्रमण, आर्थिक किंवा विदेश नीतीवर प्रश्न उपस्थित करून दाखवावेत असे आव्हानही त्यांनी दिले.
काही विशिष्ट मानसिकतेच्या व विशिष्ट वर्गाच्या काही थोड्या लोकांनाच गांधी-नेहरु कुटुंबाशिवाय कॉंग्रेस ही संकल्पना सहन होऊ शकेल. तथापि कॉंग्रेसचे नेतृत्व गांधी परिवारानेच केले पाहिजे अशी कॉंग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांची अपेक्षा व इच्छा आहे असे ते म्हणाले.
मोदी सरकार सर्वच आघाड्यावर सपशेल अपयशी ठरल्याचा दावा करून त्यांनी म्हटले आहे की करोना आणि आर्थिक स्थिती हाताळण्यात त्यांना अपयश तर आले आहेच पण आज मोदी सरकारची विदेश नीती सपशेल फसल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतापुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. या विषयांवर व्यापक चर्चा व्हायला पाहिजे असे ते म्हणाले.