कोलकता -पश्चिम बंगालमधील आमदार तुषार कांती भट्टाचार्य यांनी शुक्रवारी भाजपची साथ सोडून सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसमध्ये घरवापसी केली. ती घडामोड भाजपच्या मिशन बंगालसाठी हादरा मानली जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी करताना 42 पैकी 18 जागा जिंकल्या. त्या निवडणुकीनंतर काही महिन्यांत तृणमूलच्या 7 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सुखावलेल्या भाजपने त्या राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.
मात्र, भाजपसाठी मिशन बंगाल सहजसोपे ठरणार नसल्याचे संकेत भट्टाचार्य यांच्या घरवापसीमुळे मिळत आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी भाजपचे आव्हान मोडून काढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
पक्ष सोडून गेलेल्या सहकाऱ्यांना त्यांनी परतण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद मिळून भाजपमध्ये गळती सुरू होईल, अशा चर्चांना उधाण आले आहे. अशातच भट्टाचार्य स्वगृही परतले आहेत. पश्चिम बंगालमध्ये वेळापत्रकानुसार पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे.