कोल्हापूर – महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा आरक्षण गमावले असून त्याबाबत कॅमेऱ्यांसमोर जाहीरपणे चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महाविकास आघाडीला दिले आहे.
मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण हे दोन्ही गमावण्याच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या राज्य सरकारचाच दोष असल्याचा आरोपही त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत किती बेफिकीरी केली आणि किती दिरंगाई केली हे सर्वोच्च न्यायालयाच्या सुमारे सातशे पानी निकालात पानोपानी दिसते. या विषयावर आपली कागदपत्रांसह जाहीर चर्चेची तयारी आहे.
मराठा आरक्षणाप्रमाणेच महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत ढिलाई केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविले. परंतु नंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मागास आयोगाचा आग्रह आहे आणि त्यांना आरक्षणाच्या प्रमाणाचा आधार हवा आहे, ते ही काम महाविकास आघाडी सरकारने केले नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.