मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर काही दिवसापूर्वी एनसीबीने छापा टाकला होता. त्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या दोन इमारतींमध्ये चार मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप केला आहे. तर, सोमय्या यांनी आठ वर्षे जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. यावर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांनी माझ्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करून दाखवावा,असे खुले आव्हान दिले आहे.
“शिवसेना प्रताप सरनाईकनी माझ्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करावाच. त्यांचा भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील.” असे सोमय्या यांनी ट्विट करून उघडपणे आव्हान दिले आहे.
आठ वर्षांपूर्वीच हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश तत्कालीन महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, अद्यापही या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नसल्याचेही सोमय्या यांनी सांगितलेले आहे. तसेच, प्रताप सरनाईक यांच्याविरोधात येत्या दोन दिवसांत सर्वसामान्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
यावर प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रतिक्रिया आली असून, “महापालिकेने हे मजले अनधिकृत असल्याची नोटीस काढल्यानंतर महापालिकेच्या लोकमान्य नगर येथील शाळा बांधून दिल्याने विकास हक्क हस्तांतरच्या (टीडीआर) मोबदल्यामध्ये मिळालेले चटईक्षेत्र वापरून तसेच दंड आकारून महापालिकेने मजल्यांना परवानगी दिलेली आहे. तसेच वापर परवाना (ओसी) मिळण्यास विलंब होत असला तरीही या बांधकामामध्ये चटईक्षेत्राचे उल्लंघन झालेले नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निर्माण होत नाही. सोमय्या यांनी आठ वर्षे जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे. ” असे आमदार प्रताप सरनाईक म्हणालेले आहेत.