नवी दिल्ली : देशात कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांनी रान उठवले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.त्यावरूनच आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाष्य करताना विरोधकांवर काही गंभीर आरोप केले आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांची त्यांच्या राजकीय गुरुंकडून दिशाभूल केली जात आहे, तसेच जणू काही संपूर्ण देशातील शेतकरी त्यांच्यासोबत आहेत असे चित्र रंगवले जात आहे असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान यावेळी प्रकाश जावडेकर यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी कधी तरी लोकांसमोर येतात असा टोला लगावताना प्रकाश जावडेकर यांनी त्यांनी कृषी कायद्यांवर चर्चेसाठी जाहीर आव्हान दिलं आहे. देशातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांवर समाधानी असून पंतप्रधान किसान योजनासारख्या योजनांवरही त्यांचा आक्षेप नसल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणतात नवे कृषी कायदे रद्द करा. कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की नाही यावर मी त्यांना चर्चेसाठी जाहीर आव्हान देत आहे. राहुल गांधी आणि डीएमकेला मी आव्हान देत आहे, असे प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले. प्रकाश जावडेकर यांनी यावेळी पंजाबच्या शेतकऱ्यांना युपीएच्या तुलनेत एनडीएच्या कार्यकाळात दुप्पट मुलभूत आधार किंमत मिळाल्याचा दावा केला.