Prakash Ambedkar : राज्यातील मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारकडून अध्यादेश काढल्यानंतर मराठ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, ता कुणबी प्रमाण पात्र मिळेपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता या आरक्षणावर नव्याने महाविस्कस आघाडीत सहभागी झालेले वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी,“मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश कायदेशीर कसोटीवर टिकल्यानंतरच तो मान्य होईल. कारण ओबीसी आणि मराठा हे दोन गट एकमेकांविरोधात हरकती नोंदवत आहेत. आमची भूमिका आहे की, मराठा समाजाची गेल्या ७० वर्षांतील सत्यपरिस्थिती पाहावी लागेल. मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. आज ज्यांना निजामी मराठे म्हटले जाते, तो मुघलांबरोबर राहिले होते. जे आज आरक्षण मागत आहेत, ते रयतेमधील मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसह होते. या दोघांमध्ये जात हा समान दुवा असला आणि मावळ्यांनी मोगलाई मराठ्यांना स्वीकारले असले तरी त्यांनी रयतेच्या मराठ्यांना स्वीकारले असे नाही”, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी, “रयतेचे मराठे आणि मोगलाई मराठे यांच्यात आजही रोटी-बेटी व्यवहार होत नाही. यांच्यात सामाजिक एकत्रीकरण झालेले नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांना वेगळे काढले जाऊ शकते का? तर तशी शक्यता आहे. पण त्यासाठी सत्ता हाती लागेल आणि त्यामुळेच जनतेने आम्हाला सत्ता द्यावी, असे आवाहन आम्ही करत आहोत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाला आवाहन करून मराठा समाजावर बहिष्कार घालण्याची भाषा केली. त्याचा आंबेडकरांनी निषेध केला. “ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये कटुता आलेली आहे. हे नाकारून चालणार नाही. पण कोणत्याही समाजाचा नामोल्लेख करून अजून भांडण वाढवणे, ही वृत्ती अतिशय घातक आहे. मी त्याचा निषेध करतो. कारण वाळीत टाकणं आणि राहणं, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. मतभेद आहेत, हे मी मान्य करतो. पण शत्रूत्व असता कामा नये.” असे त्यांनी यावेळी म्हटले.