पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
धोकादायक फलकांचे नूतनीकरण करण्याची मागणी
पिंपरी – महापालिका तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांकडून जनजागृतीसाठी मोठ्या आकाराचे पत्र्याचे तसेच लोखंडी फलक विविध शासकीय कार्यालये तसेच एस. टी. स्थानक, रेल्वे स्थानक व दवाखान्यासमोर उभारण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी या फलकांची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसून येते आहे. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात असाच लोखंडी फलक उभारण्यात आला आहे. या फलकाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा फलक नेमका कशासाठी उभारण्यात आला होता. त्यावर लिहिलेला मजकूर अस्पष्ट झाला आहे. त्यामुळे फलकाचा मुख्य उद्देश साध्य होत नाही. आणि फलकाचीदेखील दुरवस्था झाली आहे. एखाद्या दिवशी रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्या रुग्ण अथवा नातेवाईक किंवा कर्मचारी यांना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात शासकीय विभागामार्फत असे अनेक फलक धोकादायक व विद्रूप अवस्थेत उभा आहे. तेव्हा महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन या फलकांचे नूतनीकरण करावे. जे फलक अनावश्यक आहेत ते काढून टाकावेत, अशी मागणी स्थानकि नागरिकांकडून होत आहे.
– एस. एन. कुंभार
बेवारस वाहनामुळे अडथळा
संत तुकाराम नगर – टी ब्लॉक एमआयडीसी, फुलेनगर येथे चार चाकी वाहन मागील काही दिवसांपासून धूळ खात पडून आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी अडथळा होत आहे. वाहतूक विभागाने याची दखल घेऊन संबंधित वाहन कोणाचे आहे याचा तपास करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून वाहन जप्त करावे. अशा बेवारस वाहनांचा उपयोग शहरात गुन्हेगारी करण्यासाठी होऊ शकतो. हे वाहन बेवारस आहे की याला कोण मालक आहे. त्याने हे वाहन येथे का टाकून दिले आहे याची चौकशी करून कारवाई करण्याची, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
पदपथावरील चारचाकी वाहन हटविले
पिंपरी – पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कालनी परिसरात वर्दळीच्या पदपथावर चारचाकी वाहन धूळ खात उभे होते. हे वाहन पदपथावर पार्क केल्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना अडचण येत होती. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत होता. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. पदपथावरून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना ये-जा करावी लागत होती. परंतु गाडी मध्येच पार्क केल्याने अडथळा निर्माण झाला होता. त्या संबंधी प्रभातने पदपथावरील वाहने हटवा या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केल्याने संबंधित प्रशासकीय विभागाने याची दखल घेऊन त्वरित कारवाई करून पदपथावरील वाहने हटविल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे येथून ये-जा करणे सुरक्षित झाले आहे. समस्येला वाचा फोडल्याबद्दल दैनिक प्रभातचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले.
– बी. एन. राजे