महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य म्हणे महाराष्ट्राला धोक्याचे ठरेल
मुंबई, ता. 5 – मुंबई राज्याच्या भवितव्यासंबंधी एकदा निश्चित मार्गदर्शन करा म्हणजे या राज्यात उठलेले वादळ शांत होईल, असे श्री एस. के. पाटील यांनी कॉंग्रेस हायकमांडला आवाहन केले.
श्री. पाटील म्हणाले, मी दिल्ली भेटीत संयुक्त महाराष्ट्रवादींचे नियोजित द्विभाषिक राज्य स्वीकारण्यासाठी प्रेमाने मन वळविण्याची कॉंग्रेस श्रेठींना विनंती केली होती. मुंबई राज्याची तीन स्वतंत्र राज्ये करण्यातील धोका मी त्यांना दाखवून दिला असून स्वतंत्र महाराष्ट्र तर गुजराथ व कोंकण भागांतील कुलाबा, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यापेक्षा महाराष्ट्रासच धोक्याचा होईल.
श्री. पाटील पुढे म्हणाले, माझे म्हणणे कॉंग्रेस श्रेष्ठींना पटले असून कॉंग्रेस कार्यकारणीच्या येत्या बैठकीत या प्रश्नावर अखेरचा निर्णय घेण्यात येईल अशी आशा आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीसंबंधी बोलताना श्री. पाटील म्हणाले, एखाद्या विवाद्य प्रश्नावर चळवळ सुरू झाली तर कॉंग्रेसजनांनी अलिप्त राहावे.
मुंबई तोडू देणार नाही
मुंबई – मुंबईबाबत बोलताना संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष श्री. शंकरराव देव म्हणाले, निसर्गानेच मुंबई शहर महाराष्ट्राला दिले आहे. ते महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही.
मुंबईचे वैभव महाराष्ट्रीय धुळीस मिळवतील असा प्रचार करणारे महाराष्ट्राचा उपमर्द करत आहेत. महाराष्ट्रीय जनता तो कधीही सहन करणार नाही.
रथ शर्यत पाहण्यास गर्दी
पुणे – येथे चालू असलेल्या वाजपेय यज्ञातील रथ शर्यतीचा विधी आज सकाळी स. प. कॉलेजच्या मैदानावर पार पडला. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे या शर्यतीसाठी 17 रथ शृंगारून तयार करण्यात आले होते.
शर्यतीचे अंतर 17 वेळा बाण मारून निश्चित करण्यात आल्यावर, शर्यतीस सुरुवात झाली. यजमानांच्या रथाला तीन पांढरे घोडे होते. तर इतर 16 रथांना प्रत्येकी एकच घोडा होता. ही शर्यत पाहण्यास तुफान गर्दी लोटली होती. विसाव्या शतकातील पुण्यात या निमित्ताने पौराणिक वातावरण निर्माण झालेले दिसत होते व भाविक लोक मोठ्या खुशीत होते.