गंगापूर धरणाचे काम संपत आले
पुणे, ता. 2 – नाशिक व नगर जिल्ह्यातील सुमारे 64000 एकर जमिनीस शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचे काम आता जवळजवळ पूर्ण झाले असून, त्यामुुळे या प्रदेशातील शेतीच्या अर्थकारणाला नवे वळण लावण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
युद्धोत्तर काळात सिमेंटचा तुटवडा लक्षात घेऊन हे धरण संपूर्णपणे मातीचे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि धरण बांधणीचे काम जून 1954 मध्ये पुरे करण्यात आले. नाशिक शहराच्या वायव्येस 9 मैलांवर सावरगाव खेड्यानजीक गोदावरी व काश्यपि नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या या धरणाला पुणे शहरातील वृत्तप्रतिनिधींनी गेल्या रविवारी भेट दिली. धरणाच्या कामावरील डेप्युटी इंजिनिअर श्री. एम. सी. शिंदे यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींना धरणासंबंधीची सर्व माहिती जागेवर दिली.
या धरणाची लांबी 12,500 फूट असून, नदीच्या पात्राच्या धरणाची कमाल उंची 123 फूट आहे. धरणाच्या माथ्यावरील रुंदी 30 फूट असून, वर रस्ता करण्यात आला आहे. ही सर्व योजना पुरी होण्यास सुमारे 6 कोटी रु. खर्च होणार आहे. आतापर्यंत 4 कोटी रु. खर्च झाले आहे.
ना. यशवंतरावांचा नवा निश्चिय
अशी एक बातमी आहे की, ना. यशवंतराव चव्हाण यांनी असे निक्षून सांगितले आहे की, ज्या इमारतीची माझ्या हस्ते कोनशिला बसविली जाईल त्या इमारतीचे काम जर ठराविक मुदतीत पूर्ण झाले नाही तर ती कोनशिला मी काढून टाकीन! एखाद्या इमारतीच्या पायाभरणीच्या वेळीच ही घोषणा त्यांनी केली असावी. ही घोषणा कोठेही व केव्हाही केलेली असो, चांगल्या गोष्टीला स्थलकालाचे बंधन नसते. ही घोषणा नामदार मुख्यमंत्री महाशयांनी अतिशय निश्चयाने पार पाडावी.
सायप्रसला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटनचा विरोध
संयुक्त राष्ट्रे – सायप्रसमधे स्वायत्त सरकार स्थापन करण्याबद्दल ब्रिटनने वाटाघाटी चालू ठेवाव्या अशा आशयाचा ठराव आज भारताचे संरक्षणमंत्री श्री. व्ही. के. कृष्णमेनन मांडणार आहेत. या विषयावर चर्चा सुरू झाल्यापासून बऱ्याच पडद्यामागील हालचाली झाल्या आहेत. संयुक्त राष्ट्राने अंतिम तडजोडीचा मार्ग दाखविला तर वाटाघाटीत बाधा येईल. या भूमिकेवरून ब्रिटन हा ठराव फेटाळून लावील असे ब्रिटनचे प्रतिनिधी ऍलन नोबल यांनी सांगितले.