-शर्मिला जगताप
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची आज जयंती. त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांच्या जीवनकार्याचे तीन भाग पाडता येतील. एक स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे योगदान, दुसरे भारतीय राज्यघटना निर्मितीकाळात ते राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते आणि तिसरे म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ.
डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान कॉंग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. 1911 मध्ये कोलकाता येथे भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनावेळी त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गांधीजींच्या विचारांनी भारावून जाऊन त्यांनी 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू झाल्यानंतर आपल्या वकिलीपेशाला रामराम ठोकून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. राजेंद्रप्रसाद यांना ब्रिटिश सरकारने 1931 मधील मिठाचा सत्याग्रह व 1942 मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. ऑक्टोबर 1934 च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. 17 नोव्हेंबर 1947 रोजी जे. बी. कृपलानी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते तिसऱ्यांदा कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर राज्यघटना निर्मितीचा काळ खूप महत्त्वाचा आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान समितीच्या अध्यक्षपदी ते निवडून आले. त्यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार केली. राज्यघटना निर्मितीस तब्बल 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस ऐवढा दीर्घ कालावधी लागला. यावर बरीच टीका झाली व आताही होते आहे. मात्र अभ्यासू अंगाने बघितले तर मोठे क्षेत्रफळ, अफाट लोकसंख्या, विविध भाषा, आचारविचार आणि विविधतेने नटलेल्या भारताला एका रेषेत बांधणे ऐवढे सोपे काम नव्हते. त्यातच आपण शतकानुशतके पारतंत्र्यात होतो.
प्राचीन काळात राजेमहाराजे, मध्ययुगीन काळात सुलतानशाही, मुघलशाही, परकीय आक्रमणे आणि आधुनिक काळात इंग्रज यांच्या अधिपत्याखाली भारत दडपला गेला होता, तर जातीयवादाने भारतीय समाज पोखरला गेला होता. अशा वेळी नव्याने स्वतंत्र झालेली भारतीय बहुतांश जनता ही अशिक्षित होती. त्यामुळे लिखित राज्यघटना महत्त्वाची ठरली. राज्यघटना लवकर मार्गी लागण्यासाठी त्यांनी घाई केली नाही कारण स्वतः राजेंद्रप्रसाद एक वकील होते. इतर प्रगत देशांच्या राज्यघटनांचा विस्तृत अभ्यास करून तसेच इंग्रजांचेही काही चांगले कायदे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना भारतीय जनतेस सुपूर्त केली.
आज भारतीय राज्यघटना जगात अनुकरणीय आणि राज्यघटनेनुसार चालणारी लोकशाही व्यवस्था सर्वोत्तम आहे. त्यांचा तिसरा महत्त्वाचा कालखंड म्हणजे राष्ट्रपतीपदाचा काळ. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. 1950 ते 1962 या 12 वर्षांच्या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविले. 28 फेब्रुवारी 1963 रोजी त्यांचे निधन झाले. अभिवादन.