शेख अब्दुल्ला भारत-पाक मैत्री जुळवून आणणार!
नवी दिल्ली, ता. 22 – इंदिराजींनी मजवर विश्वास टाकला तर मी देशाच्या व्यापक हितासाठी वाटेल ते काम करण्यास तयार आहे, असे शेख अब्दुल्ला यांनी आज सांगितले.
ते पुढे म्हणाले, भारत व पाक यांची मैत्री झालीच पाहिजे. त्याला दुसरा पर्यायच नाही. शेरे काश्मीर यांनी मुस्लीम जमातीला असा इशारा दिला आहे की, त्यांनी मुस्लीम लीगशी संबंध ठेवू नये.
आणीबाणी तूर्त रद्द होणार नाही
नवी दिल्ली – देशातील आणीबाणीची परिस्थिती रद्द करण्याची वेळ अजून आली नाही, असे केंद्र सरकारने आज जाहीर केले. एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृहखात्याचे उपमंत्री एफ. एच. मोहनसीन म्हणाले, देशातील एकूण परिस्थितीवर शासनाची सातत्याने नजर आहे.
कॉंग्रेसला पर्यायी एकच विरोधी पक्ष स्थापन होण्याची शक्यता कमी
लखनौ – सोशॅलिस्ट पार्टीचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस म्हणाले, कॉंग्रेसला पर्यायी असा नवा एकच विरोधी पक्ष स्थापन करण्यासाठी कोणताही भरीव असा कार्यक्रम सुचविला नसल्याने नवा एकच विरोधी पक्ष स्थापन होण्याची शक्यता नाही.
या संबंधात जी बोलणी झाली ती सारी हवेत निव्वळ पतंग उडविण्यासारखीच होती. या भूमिकेतून विचार करणारा एकही राजकीय पक्ष मला आढळला नाही. त्यामुळे पर्यायी पक्ष स्थापन करण्याला काही अर्थ उरत नाही.
झोपडपट्टीतील समस्या मनपाने सोडवाव्या
पुणे – झोपडपट्टीत राहणाऱ्या दलितांच्या समस्या मनपाकडून सोडविल्या गेल्या नाहीत, तर दलित पॅंथरला आपल्या मार्गाने हे प्रश्न सोडवावे लागतील, असा इशारा दलित पॅंथरचे अनिल कांबळे यांनी दिला आहे.