हिमांशू
सध्या अफगाणिस्तानात बरंच काही घडतंय आणि त्याहून अधिक घडामोडी सोशल मीडियावर घडतायत. ज्यांनी दहशत कधी पाहिलीच नाही ते लोक असे काही अकलेचे तारे तोडतायत, जणू आत्ताच युद्ध जिंकून परतलेत! काहीजणांना तर अफगाणिस्तान आणि आपली पेठ यात काहीही फरक नाही, याची खात्री आहे.
त्यामुळे घाबरण्यासाठी या मंडळींना ठोस कारणच मिळत नाहीये. वस्तुतः काही वर्षांपूर्वी दिल्लीत जेव्हा “वनमानव’ किंवा “नरवानर’ पाहिल्याची अफवा पसरली होती, तेव्हा कशी धावपळ उडाली होती आणि चेंगराचेंगरीत एका महिलेला कसा जीव गमवावा लागला होता,
हे सगळ्यांनी पाहिलंय. जो अस्तित्वातच नाही, त्याचं केवळ वर्णन ऐकून लोक एवढे घाबरत असतील, तर प्रत्यक्ष रस्त्यावरून जाताना अचानक समोर रणगाडा दिसला तर काय होईल? किंवा अचानक सात-आठ लढाऊ विमानं कमी उंचीवरून घरघरत गेली तर काय होईल?
विमानं, रणगाडे सोडा; त्याहून भीतीदायक एक वाहन जवळजवळ प्रत्येक शहरात हल्ली फिरत असतं. रणगाड्यापेक्षा अधिक दहशत या वाहनाची आहे. ते दुरून येताना दिसलं की धावपळ उडते आणि दुर्दैवानं नाही दिसलं तर आपलं वाहन रस्त्यावरून गायब होतं.
मग दंड भरून ते सोडवून आणावं लागतं. एवढ्या वर्णनावरून या “दहशतवादी’ वाहनाचं चित्र डोळ्यासमोर यायला हरकत नाही. कारण प्रत्येकानं तिचा अनुभव एकदातरी घेतलाय.
पुण्यात शुक्रवारी या वाहनानं एक दुचाकी त्याच्या चालकासह उचलली, तेव्हा हे वाहन पुन्हा चर्चेत आलं.
कंत्राटी पद्धतीनं वाहतूक पोलिसांसाठी काम करणाऱ्या या वाहनाचा नेमका उद्देश अद्याप कुणालाही कळलेला नाही. चुकीच्या ठिकाणी कुणी पार्किंग करू नये, अशा उदात्त भावनेनं काम करणारी ही मंडळी नव्हेत. उलट चुकीचं पार्किंग केलेल्या जास्तीत जास्त गाड्या सापडाव्यात आणि जास्तीत जास्त दंड वसूल करता यावा, हा या वाहनाचा हेतू.
पुण्याच्या नाना पेठेत दुचाकीस्वार रस्त्याकडेला थांबला होता. चालक जर गाडीवर बसलेला असेल तर ती पार्क केलेली आहे, असं मानलं जात नाही. तरीसुद्धा चालकाला हटकायला काहीच हरकत नव्हती आणि चालकानेही गाडी काढली असती. पण संबंधितांना ती “उचलायचीच’ होती आणि चालक विनवण्या करत असताना ती चालकासकट उचलली गेली.
हे घडत असताना कुणीतरी व्हिडिओ काढला, तर त्याच्याशीही कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप होतोय. चालकाची जरी चूक असलीच, तरी चालकासह दुचाकी उचलणं किती धोक्याचं होतं आणि काही घडलं असतं तर कर्मचाऱ्यांनी काय केलं असतं? या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? आता या प्रकाराची चौकशी वगैरे सगळे सोपस्कार निदान दाखवण्यासाठी तरी करावेच लागतील.
या निमित्तानं एक प्रश्न गांभीर्यानं चर्चिला गेला पाहिजे. वाहतुकीला शिस्त लावण्याची इच्छा वाहतूक पोलिसांना खरोखर असते का? जिथं “नो एन्ट्री’ आहे, तिथं पोलीस कधीच थांबत नाही. तो त्याच रस्त्यावर थोडा दूर थांबतो,
जेणेकरून नियम मोडणारा चालक त्याला सापडावा आणि दंडवसुली करता यावी. काही वेळा “बिनपावतीचा दंड’ही घेतला जातो, असा आरोप नाना पेठेतल्या घटनेनंतर अनेकांनी केला. शिस्त हवीय की दहशत, हे एकदा ठरवा राव!