नातरी निदैवाच्या परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ।।59।। तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु । कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ।।60।। (अध्याय 9वा)
सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात भगवंत आहे, मात्र लोक ते जाणत नाहीत. याचे उदाहरण देऊन श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, दुर्दैवी पुरूषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, पण तो तेथे राहून उपवास काढतो म्हणजेच दारिद्य्रात जीवन जगतो.
त्याप्रमाणे या शरीररूपी घरात देव आहे; पण दैवहीन मनुष्याला तो दिसत नाही. ओळखता येत नाही. दुसऱ्या ओवीत ज्ञानोबाराय म्हणतात की, सर्व सुखांचा जणू बगीचा असा मी जो राम सर्वांच्या हृदयात असताना मला न जानता काही लोक सुखाकरीता विषयांचीच इच्छा करतात.
जगद्गुरू तुकोबारायही एका अभंगात लिहितात, जनीं वनीं अवघा देव । वासनेचा पुसावा ठाव । मग वोळगा तो वासुदेव। ऐसा मनीं वसू द्या भाव गा ।। सर्व जनावनांच्या ठिकाणी व्यापक असा एक देवच आहे. तो पाहण्याकरिता वासना ही समूळ नष्ट करवी व मग त्या वासुदेवाला शरण जावे. असा भाव तुम्ही आपल्या मनात बळकट करा, असे तुकोबाराय म्हणतात.