शहरी जमिनीचे “सामाजीकरण’ सरकारचा नवा कायदा
मद्रास, दि. 6 – शहरी जमिनीचे “सामाजीकरण’ आणि तेथील जागांच्या मालकीवर कमाल मर्यादा याची अंमलबजावणी होण्यासाठी लवकरच नवीन कायदा करण्यात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी जाहीर केले. नवीन कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी, ज्या दिवशी पंतप्रधानांनी आर्थिक कार्यक्रम जाहीर केला त्या दिवसापासून झाल्याचे समजण्यात येईल. लोकांनी कमाल धारणा कायद्यातून पळवाट काढण्यासाठी जागा दुसऱ्याचे नावे करू नये म्हणून हे करण्यास येईल.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा
अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासंबंधी विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीला येऊन कृषिमंत्र्यांसोबत 20 कलमी कार्यक्रमाबद्दल चर्चा करतील.
वृत्तपत्र पूर्वतपासणीचे निर्बंध अन्यायकारक
पुणे – वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके आदी प्रकाशनांवर केंद्र सरकारने पूर्वतपासणीचे निर्बंध लागू केले आहेत, ते अन्यायकारक असून त्वरित दूर करावेत, अशी मागणी पत्रकार संघातर्फे केली आहे.
केवळ पाण्यावर 8 वर्षे जगणारी मुलगी
सिमला – चंबा जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लोकांना एक मुलगी अशी आढळली की, तिने 8 वर्षांत अन्न खाल्ले नाही. तिला तिच्या नातेवाईकांनी जेव्हा सक्तीने अन्न खावयास लावले तेव्हा थोडे जरी अन्न तिच्या पोटात गेले तरी ती बेशुद्ध होत असे, तिची दृष्टी व कान काम करत नसत. पुढे अन्न देण्याचा प्रयत्न सोडून देण्यात आला. ही मुलगी फक्त पाणी पिते अन् जगते, असे आढळून आले. या मुलीसंबंधी अनेक अफवा त्या भागात प्रचलित आहे. ती एक हडळ आहे असे लोक म्हणतात.