नगर -करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनपूर्वी पासूनच सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा आधारकार्ड संबंधित माहिती उपलब्ध करून देण्याबाबतचे शिक्षण संचालकांचे आदेश स्थगित करावे व संच मान्यतेसाठी विद्यार्थी संख्येचा निकष ही अट कमी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाच्यावतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
संच मान्यतेसाठी विद्यार्थी संबंधित आधारकार्डची माहिती तात्काळ उपलब्ध करण्याचे आदेश नुकतेच शाळांना शिक्षण संचालक कार्यालयाने 30 एप्रिलला निर्गमित केले आहे. तसेच लॉकडाऊननंतर उन्हाळी सुट्टीत आधारकार्ड काढण्याची सूचना केली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू होऊन मोठा कालावधी लोटला आहे. या कालावधीत शाळा बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. आजही जैसे थे परिस्थिती आहे. असे असताना विद्यार्थी संबंधित हा सगळा दस्त तातडीने उपलब्ध करून देणे शक्य नाही. अनेक विद्यार्थी व पालक गावी गेले आहेत. काही जवळ आधारकार्ड उपलब्ध नाहीत.
तसेच वर्षभर विद्यार्थी उपस्थित असूनही आधारकार्ड नसल्याने ते संच मान्यतेसाठी धरले जाणार नसल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. परिणामी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कमी होतील. काहींनी आधारकार्डची नोंदणी केली असून, त्याची फक्त विद्यार्थ्यांकडे पावती आहे. त्या दृष्टीने शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन निर्णय घेतला होता. अनुदानित शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्येचे निकष अगोदर शिथिल करावेत. अशी मागणी होत आहे.