नगर -लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नगर शहरात बाहेर गावाहून नागरिकांचे लोंढे मोठ्या प्रमाणात दाखल झाले. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. महापालिकेने बाहेरुन येणाऱ्या नागरीकांवर विशेष लक्ष द्यावे, अशी भूमिका सुरक्षा समितीमधील सहभागी सदस्यांनी मांडली.
महापालिकेलच्या प्रभाग दोनमधील सुरक्षा समितीच्या बैठकीत भूमिका मांडली. बाहेरून आलेल्या नागरिकांनी समितीशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी. तसेच स्थानिक नागरिकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती तातडीने मनपा प्रशासनाला कळवावी, असे आवाहन सुरक्षा समितीने केले.
माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेवक विनीत पाउलबुद्धे, डॉ गणेश मोहोळकर, बबन काळे, सुरेश वाघ, अजय कांबळे, बाळू वाघचौरे, प्रसाद उमाप, भारत कांडारे, ऋषिकेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते. करोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सुरक्षा समिती गठीत केल्या असून त्यांचे काम सुरू झाले आहे.
सुरक्षा समितीच्या या बैठकीत अनेक अडचणी समोर आल्या. प्रामुख्याने सुरक्षा समितीमार्फत ज्या बाहेरून आलेल्या नागरिकांना शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले जाते. त्यावेळी तेथील यंत्रणेमार्फत नागरिकांना सहकार्य होताना आढळत नाही. तसेच नागरिकांना खूप काळ तपासणीसाठी ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे तपासणीसाठी जाणाऱ्या नागरिकांना देखील संक्रमित होण्याची भीती वाटते. तर प्रशासनाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी वारे यांनी व्यक्त केली. तपासणी पथकातील डॉक्टर घरोघरी जाऊन बाहेरून आलेल्या नागरिकांची तपासणी करत आहेत. त्यांनाच परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले, तर नागरिकांना होणाऱ्या मानसिक त्रास आणि संक्रमित होण्याच्या भीती पासून वाचण्यास मदत होईल असे ते म्हणाले.