कामशेत, दि. 23 (वार्ताहर) -मावळ तालुक्यातील महत्वाचे शहर असलेल्या कामशेतमध्ये दिवाळीसारख्या वर्षाच्या सणासुदीला होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने अजून किती दिवस आम्ही हा त्रास सहन करायचा? असा उद्वीग्न कामशेतकर करत आहेत.
मावळ तालुक्यातील कामशेत शहर हे वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या असणारे शहर आहे. मात्र कामशेत ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावात अनेक दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. जलशुध्दीकरण प्रकल्पाचे योग्यप्रकारे संचलन होत नसल्याने नागरिकांना अनेक दिवसांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेक भागात पाणी वेळेवर येत नसल्यानेनागरिक त्रस्त झाले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग, शेतकरी, व्यापारी, मजूर अशी संमिश्र लोकसंख्या आहे. तर शहरातील सहारा कॉलनी, गरुड कॉलनी, देवराम कॉलनी आदर्श कॉलनी, पंचशील कॉलनी, राजेंद्रनगर या भागांत अनेक दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
कामशेत ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा वॉटर फिल्टर टॅंक दुरुस्ती व वॉल बदलणे हे काम दिवाळीनंतर 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. उर्वरित कामाची वर्क ऑर्डर तयार केला आहे. व त्यासाठी लागणारा निधी मंजूर झालेला आहे. काही दिवसांत हे कामदेखील प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
– विलास काळे, ग्रामविकास अधिकारी
गेली पाच सहा महिन्यांपासून आम्हाला गढूळ पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायत कडून केला जात आहे. वारंवार या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी आकारली जाते मात्र. पिण्यासाठी गढूळ पाणी दिले जात आहे. त्यात खडकाळे (कामशेत) ग्रामपंचायत स्वच्छ पाणी नागरीकांना मिळण्याबाबत जनहिताचा विचार करत नाही.
– किशोर ओव्हाळ, नागरिक